नितेश राणे: सिंधुदुर्गनगरीत उबाठाच्या मंगेश लोके यांच्यासह शेकडोंचा भाजपाला प्रवेश..
ओरोस ता ४
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता विरोधकच राहिले नाही. महा विकास आघाडी संपलेली आहे. आता आमच्या महायुतीतील पक्षांत स्पर्धा होणार आहे. कणकवली विधानसभा क्षेत्रातील १९ जिल्हा परिषद मतदार संघात भाजपचे उमेदवार निवडून येणार. सत्तेसाठी २७ लागत असल्याने अन्य दोन मतदारसंघात केवळ ८ निवडून येणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता येणारच आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी उबाठा शिवसेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके व सहकाऱ्यांच्या भाजप पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना केले.
सिंधुदुर्गनगरी येथील भाजपच्या वसंतस्मृती जिल्हा कार्यालयात शनिवारी दुपारी पक्षप्रवेश कार्यक्रम मंत्री राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, प्रमोद रावराणे, वैभववाडी भाजप अध्यक्ष सुधीर नकाशे, संध्या तेरसे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, बंड्या मांजरेकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मंत्री राणे यांनी खांबाळे गावात भाजप कार्यकर्ते जास्तीतजास्त यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु कधीच १०० यश मिळाले नाही. परंतु मंगेश लोके यांच्या भाजप प्रवेशाने खांबाळे गावासह वैभववाडी तालुक्यात शत प्रतिशत भाजप झाली आहे. माझ्या आमदारकीच्या दहा वर्षात माझ्यात आणि लोके यांच्यात स्पर्धात्मक वातावरण राहिले आहे. मला नेहमी वाटते की विकासासाठी एकाच पक्षाच्या झेंड्याखाली सर्वांनी आले पाहिजे. ते काम मंगेश लोके यांनी केले आहे. त्यामुळे आमची ताकद वाढली आहे. खांबाळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण निधी कमी पडू देणार नाही. तुमचा हक्काचा आमदार पालकमंत्री आहे. तुम्ही मागायचे आणि मी देणार. रस्ते, पाणी, वीज ही नेहमीची कामे होतच राहतील. परंतु खांबाळे गाव मॉडेल करण्यासाठी विविध प्रकल्प सुचवा. त्यासाठी आपण प्रयत्न करू, असे प्रवेश करणाऱ्या उबाठा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सांगितले.
यांनी केला प्रवेश
वैभववाडी तालुका उबाठा शिवसेना प्रमुख मंगेश लोके, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिगंबर पाटील, खांबाळे सरपंच प्राजक्ता कदम, निमअरुळे शाखा प्रमुख विलास इस्वलकर, कोकिसरे महिला शाखा प्रमुख सोनाली पवार, माजी शाखा प्रमुख परेश सावंत, सोसायटी चेअरमन प्रवीण गायकवाड, माजी सरपंच गौरी पवार, संजय साळुंखे, विठोबा सुतार, संचीता गुरव, सारिका सुतार यांच्यासह ग्रामपंचायतचे आजी माजी सदस्य, सोसायटी आजी माजी संचालक अशा शोकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
