महसूल मंत्र्यांना २-४ तासांच्या दौऱ्यातून जिल्ह्याचे प्रश्न किती समजले ?

मनसे उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल..

कुडाळ : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यातील आढावा बैठकीच फलित नेमकं ते काय? चार दिवसाचा खासगी व दोन-चार तासांचा धावता शासकीय दौरा याच्यातून महसूलमंत्र्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खरोखरच प्रश्न समजतील का, असे सवाल मनसेचे उप जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केले आहेत.
मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, गेल्या चार दिवसापासून सर्व शासकीय लवाजम्यासह सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असणारे महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल सिंधुदुर्ग जिल्हा आढावा बैठक घेतली. मुळात मंत्री महोदय चार दिवसांपासून खाजगी दौऱ्यावर असताना या दौऱ्यासाठी शासकीय खर्चच करण्यात आला आहे. एकीकडे शेतकरी-ठेकेदार आत्महत्या, बेरोजगारी, महागाई या संकटात शासकीय कंत्राटदारांना देण्यासाठी सरकारकडे निधी नसल्याचे सांगितले जाते तर दुसरीकडे मंत्री महोदय स्वतःच शासकीय खर्चातून आपले खाजगी दौरे आखत आहेत. महसूलमंत्र्यांच्या या दौऱ्यामध्ये मंत्रिमहोदयांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जमिनीचा व्यवहार देखील केल्याची जोरदार चर्चा आहे. खाजगी दौऱ्यामध्ये किंवा दोन-चार तासासाठी जिल्ह्याची आढावा बैठक घेऊन मंत्री महोदयांनी नेमकं काय साध्य केलं आणि त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला नेमका कसा काय फायदा होईल, असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे.

You cannot copy content of this page