स्वतंत्रता का उत्सव स्वच्छ्ता की संग…

जिल्हा वासियानी मोठ्या उत्साहात सहभागी व्हावे:उपमुख्य कार्यकारी अधिकारी सावंत यांचे आवाहन..

ओरोस ता ७
सांस्कृतिक मंत्रालय यांच्या माध्यमातुन देशभरात ” हर घर तिरंगा ” मोहिम राबविण्यात येत आहे. हि मोहिम आता राष्ट्रीय अभिमान आणि लोकांच्या सहभागाचा उत्सव बनली आहे. या वर्षीच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त, “हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता” हि मोहिम “स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग” या टॅग लाईन अंतर्गत पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय व सांस्कृतिक मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यामाने ८ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व जिल्हावासियांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य सावंत यांनी केले आहे.
हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता” हि मोहिमेची संकल्पना लोकसहभागातुन उत्सव व नागरी एकतेच्या भावनेवर आधारित आहे. ज्यामध्ये स्वातंत्र्याचा सार स्वच्छता व सुजलता या संकल्पनेशी जोडली गेली आहे. पंतप्रधानांची संकल्पना बळकट करण्यासाठी ग्रामीण भागात, स्वच्छ पाणी पुरवठा, शाश्वत स्वच्छता व आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी WaSH (पाणी, स्वच्छता आणि आरोग्य) या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर ८ ऑगस्ट रोजी शुभारंभ करण्यात येणार असुन स्वच्छ सुजल गाव प्रतिज्ञा नागरीक व शालेय विद्यार्थ्याच्या माध्यमातुन घेण्यात येणार आहे. ९ ते ११ ऑगस्ट या कालावधीत सार्वजनिक स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणे, जलकुंभ, पाणी आणि स्वच्छता सुविधांची स्वच्छता करणे. गावातील विद्यार्थी, युवक यांची स्वच्छता रॅली, वैयक्तिक घरगुती स्तरावर रांगोळी काढणे व स्वच्छता घटकांना रंगकाम करणे. नाल्यांची स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, पाण्याची गळती शोधणे व थांबवणे. सार्वजनिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन केंद्र, प्लास्टीक व्यवस्थापन केंद्र परिसरासह इतर सार्वजनिक ठिकणी स्वच्छता मोहिम राबवणे. प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवून त्याच्या व्यवस्थापनाशी संबंधित तपासणी करणे. सार्वजनिक स्वच्छताः “आझादी का श्रमदान” सार्वजनिक ठिकाणासह रस्त्यांवर साफसफाई करणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
१२ ऑगस्ट हा पायाभूत सुविधा स्वच्छता दिन म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पायाभूत सुविधांची स्वच्छता व सुशोभीकरणावर विशेष भर देण्यात येणार आहे. (पाण्याच्या टाक्या, स्रोत, नळ जोडणी, पंप हाऊस इ). देशभक्तीपर थीमसह पाणी आणि स्वच्छता स्थळांचे रंगकाम आणि सजावट करणे व पायाभुत घटकांवर तिरंगी धागे बांधणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत कळविण्यात आले आहे. १३ ऑगस्ट रोजी स्वच्छता संवाद आणि जागरूकता दिन म्हणुन साजरा करण्यात येणार असुन कचरा व्यवस्थापन तांत्रिक प्रात्यक्षिक (वर्गीकरण, कंपोस्टिंग) व शौचालय देखभाल, जलसंवर्धन, भूजल पुनर्भरण, जलस्रोत संरक्षण, एकल वापराचे प्लास्टिक टाळणे इत्यादींबाबत जनजागृती करणे. ग्रामस्थांद्वारे वैयक्तिक शौचालय स्वच्छता उपक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
१४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाची तयारी यामध्ये गावातील सार्वजनिक ठिकाण, रस्ते, चौक, बाजारपेठा, पाणी, स्वच्छता आणि आरोग्य स्थळांची अंतिम स्वच्छता व सजावट आणि ध्वजारोहणासाठी ठिकाण निश्चित निश्चित करून साफसफाई करणे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी स्वच्छता चॅम्पियन आणि स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व जिल्हावासियांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अजिंक्य सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page