विरसिंग वसावे:मुळदे येथे महास्वराज्य अभियान शिबिराचे आयोजन..
कुडाळ : आपल्या दैनदिन जीवनात शिक्षण क्षेत्राबरोबरच इतरही बाबतीत दाखल्यांचे महत्त्व खूप आहे. विशेषत: जातीचा दाखला, वय अधिवास आणि उत्पन्नाचा दाखला हे विविध योजनेच्या लाभासाठी उपयुक्त आहेत. लाभार्थ्यांनी हे दाखले वेळीच उपलब्ध करावे व येणाऱ्या अडचणीच्या समस्या वेळेत दूर कराव्यात असे प्रतिपादन तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी आज मुळदे महाराजस्व अभियानात (शासन आपल्या दारी) केले. कुडाळ तालुक्यात हा उपक्रम राबविणारी मुळदे ग्रामपंचायत पहिली असल्याचे सुद्धा श्री वसावे यांनी सांगितले .
कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत मुळदे व महात्मा गांधी तंटामुक्त गांव समिती मुळदे यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील सर्वसामान्य नागरिकांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तहसिलदार कार्यालय कुडाळ यांच्या सहकार्याने महाराजस्व अभियान (शासन आपल्या दारी) या शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत आज बुधवार (ता४) ग्रामपंचायत कार्यालय मुळदे येथे विविध शासकीय योजना व त्यासाठी आवश्यक असणारे दाखले यांचा लाभ मिळणेकरीता शिबिराचे आयोजन करण्यात होते. या शिबिराचे उदघाटन राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून तहसीलदार वसावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुडाळ पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र पालये, पोलीस उप निरीक्षक प्रमोद वाघाटे, सरपंच श्रीम. संध्या मुळदेकर ,सहायक पोलीस उप निरीक्षक दयानंद चव्हाण, मंडळ अधिकारी प्रशांत मसुरकर, उपसरपंच
सौ. अपूर्वा पालव, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष गणपत चव्हाण, पोलीस पाटील तथा निमंत्रक रामदास चव्हाण , ग्राम महसुल अधिकारी आंबडपाल दत्तात्रय जगताप ग्रामपंचायत अधिकारी गोविंद तोरस्कर , सौ. वैशाली पालव, चंद्रकांत पालव, गुरुनाथ चव्हाण, भिवा द पालव, सीताराम पालव, संजय मुळदेकर, भिवा कृ. पालव, भिकाजी जाधव, साक्षी पालव सर्व ग्रामपंचायत सदस्य व महात्मा गांधी तंटामुक्त गांव समिती सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. वसावे म्हणाले, शासनाची योजना राबविताना कुडाळ तालुक्यात विशेषतः लाडकी बहीण योजनाची पहिली माहिती देण्यामध्ये मुळदे गावाने सर्वप्रथम कामगिरी केली. तशीच कामगिरी दाखले शिबिर घेऊन शिबिरामध्ये दाखले वितरण फॉर्म उपलब्ध करून देण्यामध्ये सुद्धा मुळदे ग्रामपंचायत अग्रेसर ठरली आहे. विशेषतः आपल्या दैनंदिन जीवनात दाखल्यांचे महत्त्व खूप आहे. 98 प्रकारच्या सुविधा उपलब्ध असून प्रत्येकानी कोणत्या गोष्टीसाठी कोणता दाखला महत्त्वाचा आहे ते जाणूनच दाखले घ्यावेत. शैक्षणिक दृष्ट्या दाखले फार महत्त्वाचे आहेत. ऐन धावपळीच्या वेळी दाखले काढून घेण्यापेक्षा वेळेत दाखले काढा याच अनुषंगाने मुळदे ग्रामपंचायतने दाखले वितरण या ठिकाणी उपलब्ध केले असल्याने त्यांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. आपल्याला दैनंदिन जीवनात तसेच शालेय बाबतीत विविध कारणासाठी दाखले लागतात यामध्ये विशेष करून जातीचा दाखला, वय अधिवास आणि उत्पन्नाचे दाखले हे विविध योजनांसाठी लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत. ते दाखले गरजूंनी समस्या उद्भवण्यापूर्वीच घ्यावेत जेणेकरून या दाखल्यांसाठी पुढील गैरसोय होऊ नये, असे श्री. वसावे म्हणाले.
प्रत्येक माणसाची वेगळी ओळख असते. शेतकऱ्यांची सुद्धा ओळख व्हावी या अनुषंगाने ऍग्रोटेक हे महत्त्वाचे आयकार्ड आहे. शेतकऱ्यानी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री वसावे यांनी केले.
पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र पालवे यांनी मुळदे ग्रामपंचायतीने एक सामाजिक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. गरजूंसाठी दाखले फॉर्म देणे आणि ते गावातच उपलब्ध करून देणे हा त्याचा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले .मंडळ अधिकारी प्रशांत मसूरकर यांनी सुद्धा ग्रामपंचायत मुळदे आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती मुळदे यांचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुळदे ग्रामपंचायत परिसरात वृक्ष संवर्धन काळाची गरज ओळखून विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील तथा निमंत्रक रामदास चव्हाण यांनी केले. तर आभार ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी गोविंद तोरस्कर यांनी मानले.
