शेकडोंनी नागरिक निवेदने घेवून दाखल..
ओरोस ता २७
पालकमंत्री नितेश राणे यांनी आयोजित केलेल्या पहिल्याच जनता दरबारात नागरिकांची जत्रा फुलली होती. जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा पहिलाच कार्यक्रम हाऊसफुल झाला. त्यामुळे पालकमंत्री कक्षात सुरू केलेला हा कार्यक्रम हलवून जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात घेण्यात आला.
जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यावर मंत्री राणे यांनी जनेतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी महिन्यातून एकवेळ जनता दरबार घेतला जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिला जनता दरबार गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री कक्ष येथे दुपारी सुरू करण्यात आली. सुमारे तासभर हा जनता दरबार सुरू राहिला तरी जनतेच्या समस्या संपल्या नव्हत्या. कार्यालयाबाहेर शेकडोंनी नागरिक समस्यांची निवेदने हातात घेवून उभे होते. त्यामुळे जनता दरबाराचे ठिकाण जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात हलविण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह अन्य अधिकारी, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
