कवी नितीन चंदनशिवे यांचे मालवण येथे प्रतिपादन..
⚡मालवण ता.०९-:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाईंना वंदन करताना त्यांची कणखरता प्रत्येकाने आत्मसात करण्याची आत्यंतिक गरज आज आहे एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रात कुठलीच महिला ही प्रगती होण्यापासून वंचित राहू नये हे अपेक्षा व्यक्त करताना आपल्या हक्कासाठी त्यानी लढलं पाहिजे, पुन्हा उभं राहिलं पाहिजे असे प्रतिपादन सांगली येथील दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांनी येथे बोलताना केले
मालवण नगरपरिषदेच्या वतीने मालवण नगरपरीषद सभागृह येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी कवी नितीन चंदनशिवे हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक संतोष जिरगे उपस्थित होते. यावेळी कृषी विभाग अधिकारी श्रीम. जयश्री दुधभाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीम. संध्या लोखंडे व श्रीम. सुरेखा खैरनार प्रशासकीय अधिकारी संध्या गवळी, श्री. खेमराज सावंत आदी व इतर उपस्थित होते प्रारंभी पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला .
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांनी स्वानुभवातून महिलेची थोरवी सांगितली. कविता हे आपलं अस्तित्व आहे आणि आपल्या विवाहानंतर ते अस्तित्व डोळसपणे खुलवण्यात आपल्या पत्नीचे योगदान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कवी नितीन चंदनशिवे यांनी त्यांच्या स्वरचित कवितांच्या सादरीकरणातून उपस्थितांना महिला दिनाच्या उद्देशांची महती समजावली व शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी जागतिक महिला दिन हा समस्त मानवजातीची चळवळ आहे. महिलांचे सक्षमीकरण ही महत्वाची बाब असून सर्वांनीच त्यासाठी जबाबदारीपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी सांगितले
या कार्यक्रमात मालवण नगरपरिषदेच्या वतीने मान्यवरांना ‘मालवण व्हिजन’ या स्मरणिकेची प्रत भेट देण्यात आली.
या कार्यक्रमाला मालवणातील महिला बचत गटांच्या सदस्या, मालवण नगरपरीषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी संध्या गवळी यांनी केले तर श्री. खेमराज सावंत यांनी आभार प्रदर्शन केले.
