⚡वेंगुर्ला ता.२७-: सध्या धुक्याचे प्रमाण वाढले असून त्याचा फटका आंबा आणि काजू पिकाला बसला आहे. दोन्ही पिकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या दोन्ही पिकाला फळविम्याचा निकष न लावता त्याचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज सिधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनतर्फे वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चालू वर्षीच्या हंगामामध्ये प्रचंड स्वरूपात दहा ते पंधरा दिवस सतत पडणा-या धुक्यामुळे आंबा व काजू पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. यासाठी सरकट नुकसान भरपाई मिळावी असे निवेदनात नमूद केले आहे. याव निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर राय, संदिप देसाई, गणेश परब, सागर गावडे, अंकुश गावडे, वासुदेव गावडे, अमोल बरकुटे, भिवा गावडे, सुभाष मालवणकर यांच्या स्वाक्ष-या आहेत.
