लघु सूक्ष्म मध्यम उद्योजकांना दिलासा व अर्थचालना देणारा अर्थसंकल्प…

विजय केनवडेकर:पारंपरिक व्यवसायाला चालना मिळून रोजगार निर्मितीला हातभार लागणार..

⚡मालवण ता.०१-:
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या देशाच्या अर्थसंकल्पात लघु सूक्ष्म मध्यम उद्योजकांवरती विशेष लक्ष दिल्याचे जाणवते. लघु सूक्ष्म मध्यम उद्योगांमधील उद्योजकांना स्वस्त व कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर पाच लाखाचे क्रेडिट कार्ड पण उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारची कर्जासाठी असणारी गॅरेंटी देख केंद्र सरकार मार्फत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लघु सूक्ष्म मध्यम उद्योजकांना दिलासा देणारा व अर्थचालना देणारा हा अर्थसंकल्प आहे, असे मत भारत सरकारच्या उच्चस्तरीय मॉनिटरिंग कमिटी व नॅशनल एससी /एसटी हब लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालयाचे राष्ट्रीय सदस्य विजय केनवडेकर यांनी व्यक्त केले आहे.

सन २०२५ च्या अर्थसंकल्पात नवीन स्टार्टअप उद्योगासाठी २० करोड पर्यंत निधी उपलब्ध करून दिला आहे. बारा बलुतेदारी मधील विश्वकर्मा योजनेतील उद्योजकांना या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. अनुसूचित जाती व जमाती SC/ST वर्गातील पाच लाख उद्योजक महिलांना वेगळे अनुदानित धोरण जाहीर करण्यात आले आहे. चामड्याच्या वस्तू तयार करणाऱ्या २२ लाख कर्मचाऱ्यांना वेगळ्या प्रकारचे रोजगार धोरण आखून चर्मकार उद्योगाला मोठी चालना देण्यात आली आहे. यामधूनच मोठ्या प्रमाणात विदेशी चलन उपलब्ध होऊ शकते, असे विजय केनवडेकर यांनी म्हटले आहे.

कुशल कारागीर उद्योगांसाठी आवश्यक असणारे कुशल कारागीर तयार करण्यासाठी व विक्री व्यवस्थेसाठी देशांमध्ये नऊ नवे स्किल सेंटर मध्यम सूक्ष्म लघु मंत्रालयामार्फत स्थापन करण्यात येणार आहेत. घरामध्ये इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक वस्तू तयार करणाऱ्या उद्योगांना विशेष सवलत देण्यात आली आहे व त्याचे आधुनिकरणासाठी विशेष सूट देण्यात आली आहे. मध्यम उद्योगासाठी दोन करोड ते दहा करोड पर्यंत कर्ज पुरवठा व्यवस्था करण्यात आली आहे. हाती विणलेल्या कापड व कपडे करमुक्ती मुळे स्वस्त होणार आहेत. सामूहिक उद्योगाला चालना देण्याचा व कर्जाच्या व क्रेडिट कार्ड च्या मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत.

अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार लघु सूक्ष्म मध्यम उद्योजकांना कर्ज पुरवठा व विशेष योजनेसाठी कमीत कमी कागदपत्राची पूर्तता करून परवानगी सुलभ होण्यासाठी विशेष धोरण आखण्यात येणार आहे. लघु सूक्ष्म उद्योजकांना ज्या सवलती उपलब्ध करून दिल्यामुळेच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी देखील उपयोग होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लघु सूक्ष्म मध्यम उद्योजकांना बारा लाखापर्यंत कोणताही टॅक्स नाही. यामुळे उद्योगाला आर्थिक सवलत मिळणार आहे. अर्थसंकल्प २०२५ मध्ये लघु सूक्ष्म मध्यम उद्योजकांना व त्यातील विशेष करून अनुसूचित जाती जमाती मधील उद्योजकांना , विश्वकर्मा योजनेतील कारागीर उद्योजकांना विशेष लक्ष देऊन विशेष सवलत देण्यात आलेली आहे. यामुळे पारंपरिक व्यवसायाला चालना मिळून रोजगार निर्मितीला हातभार लागणार आहे, असेही विजय केंनवडेकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page