शेती हेच रोजगाराचे शास्वत साधन…

कमलताई परुळेकर:नाधवडे येथील प्रगतशील शेतकरी राखी राजेश तावडे यांना ‘गोपुरी कृषी सन्मान’ पुरस्कार प्रदान..

⚡कणकवली ता.२७-: शेती हेच शाश्वत रोजगाराचे साधन आहे. भविष्यात ग्रामीण भागाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर शेती शिवाय दुसरा पर्याय नाही. याकरिता तरुण वर्गाला शेतीत आणण्यासाठी सामाजिक पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त गोपुरी आश्रमाने नाधवडे, तालुका- वैभववाडी येथील राखी राजेश तावडे या प्रगतशील महिला शेतकरी भगिनीला ‘गोपुरी कृषी सन्मान पुरस्कार’ प्रदान करताना केले.

यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र मुंबरकर, उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, सचिव विनायक मेस्त्री, संचालिका अर्पिता मुंबरकर, राजेश तावडे, मराठा ऑर्गनायझेशन मुंबई चे जिल्हाद्यक्ष प्रमोद सावंत, मनोज सावंत, विनायक सापळे, सुरेश रासम, आशिष सावंत, संभाजी ब्रिगेडचे जावेद खान, गोपुरी आश्रमाचे कार्यकर्ते सदाशिव राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

नाधवडे येथील प्रगतशील महिला शेतकरी राखी राजेश तावडे यांना गोपुरी आश्रमाच्या वतीने यावर्षीचा ‘गोपुरी कृषी सन्मान’ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कमलताई परुळेकर पुढे म्हणाल्या की भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती व्यवसायाला चांगले दिवस येण्यासाठी सामूहिक प्रयत्न होण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी न विकता आपण जमिनीत कष्ट करायला हवेत. शासनाने नागरिकांना फुकट धान्य देण्यापेक्षा शेतीची यंत्रे द्यावीत जेणेकरून शेतकऱ्यांचे श्रम कमी होऊन त्यांना फायदेशीर शेती करता येईल.
एकेकाळी ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी’ अशी स्थिती होती ती पुन्हा निर्माण होणे गरजेचे आहे. राखी तावडे यांच्या शेतीतील प्रयोगांचा नागरिकांनी आदर्श घ्यायला हवा.

राखी तावडे यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आपण आपल्या शेतीत विविध प्रयोग केले. शासनाने दिलेल्या यंत्रसामुग्रीमुळे श्रमाची बचत होऊ शकली. कृषी विभागाने चांगले सहकार्य केले, त्यामुळे आंम्हाला शेतीतून योग्य प्रकारे उत्पादन घेता आले असे सत्कारास उत्तर देताना सांगितले.
यावेळी गोपुरी आश्रमाचे उपाध्यक्ष कृषी तज्ञ श्री. व्ही. के. सावंत यांनीही आपले विचार मांडले. शेतीतून निसर्ग उभा करण्याचा प्रयत्न करूया असेही त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले, तर आभार सचिव विनायक मेस्त्री यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कणकवली आणि परिसरातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page