तात्काळ बंदीची अनिस सिंधुदुर्गची मागणी:जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन..
कुडाळ : कॅन्सर सारख्या आजारास कारणीभूत ठरत असलेल्या चहाच्या कागदी कपवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग कडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. राजीव बिले, जिल्हा कार्यवाहक विजय चौकेकर आणि ॲड. शुभेश वांजिवाले, ॲड. हेमांगी वराडकर हे उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी व घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणात कागदी चहाचे कप चहा पिण्यासाठी वापरले जातात. या कागदी कपांना आतील बाजूस BPA नामक प्लास्टिक केमिकल वापरले जाते. त्यामुळे कागदी समजणारा कप पूर्ण पणे कागदी नसतो.या कागदी कपात गरम चहा किंवा गरम पाणी टाकल्यावर BPA प्लास्टिक केमिकल वितळते व त्याचे बारिक कण चहासोबत शरिरात जातात. बऱ्याच लोकांना अशा कागदी कपातून चहा पिल्याने कॅन्सर आजार जडलेला आहे. त्यामुळे अशा कागदी चहा कपवर तात्काळ बंदी घालण्यात यावे व तसे आदेश निर्गमित व्हावेत.अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग कडून करण्यात आली आहे. असे आदेश यापूर्वी बुलढाणासह अनेक जिल्हयांनी काढल्याचे निवेदनात म्हटले आहे.
