Headlines

मत्स्य विभाग अजून किती मच्छीमारांचा बळी जाण्याची वाट पाहणार.. ?

मच्छीमार नेते रश्मीन रोगे यांचा संतप्त सवाल..

मालवण (प्रतिनिधी)

निवती समुद्रात मच्छीमारी करून परत येत असताना नौका पलटी होऊन दोन मच्छीमारांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचे मच्छीमार म्हणून आम्हाला दुःखच आहे. परंतु मत्स्य विभागाने अनधिकृत मासेमारीकडे डोळेझाक केल्यामुळे अशा घटना घडत असून अजून किती मच्छीमारांचा बळी जाण्याची वाट मत्स्य विभाग पाहणार आहे? असा संतप्त सवाल मालवण दांडी येथील मच्छीमार नेते रश्मीन रोगे यांनी केला आहे.

निवती समुद्रातील दुर्घटनेनंतर रश्मीन रोगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मत्स्यउद्योग मंत्री व मत्स्य विभागाच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. सिंधुदुर्गात अनधिकृत मासेमारीचे प्रमाण वाढले आहे. अनधिकृत पर्ससीन आणि मिनी पर्ससीन मासेमारी नौका बिनदिक्कतपणे येथील समुद्रात मासेमारी करत आहेत. पारंपारिक मच्छीमारांनी अशा अनधिकृत मासेमारीच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवित लढाही उभारला आहे. अनधिकृत मासेमारी नौका चोरी छुप्या पद्धतीने रात्री अपरात्री समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी बाहेर पडत असतात. अशा अनधिकृत मासेमारीकडे मत्स्य विभाग सोयीस्करपणे डोळेझाक करत असून या प्रकारांमुळे सर्वसामान्य मच्छीमाराचा जीव धोक्यात आला असल्याचे रश्मीन रोगे यांनी म्हटले आहे.

मत्स्योद्योग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात अनधिकृत मासेमारीला आळा बसण्यासाठी सिंधुदुर्गात गस्ती नौका देणार असल्याचा शब्द दिला होता. परंतु अद्याप शासनाची कोणतीही गस्ती नौका समुद्रात दिसून आलेली नाही. सुसज्ज गस्तीनौकेची मागणी करून सुद्धा पारंपारिक मच्छीमारांच्या मागणीला मत्स्योद्योग मंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत, अशी टीका रोगे यांनी केली आहे.

सिंधुदुर्गला १२१ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्रात त्याचप्रमाणे अनेक खाड्यांमध्ये पारंपारिक पद्धतीने मासेमारी केली जाते. किनारपट्टीवरील लोकांचे जीवनमान मासेमारीवर अवलंबून आहे. मच्छीमारांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. असे असताना सुद्धा मत्स्योद्योग मंत्र्यांनी आपल्या मंत्रालयातील चेंबर मध्ये बसून या खात्याचा कारभार हाकण्यात धन्यता मानली आहे. आपल्या कार्यकाळात मत्स्योद्योग मंत्री येथील किनारपट्टीवर येऊन मच्छीमारांचे प्रश्न समजून घेतले असते आणि ते सोडविण्याचा प्रयत्न केला असता तर पारंपारिक मच्छीमारांवर संघर्षाची वेळ आली नसती, असेही रोगे यांनी म्हटले आहे. किनारपट्टीवरील संपूर्ण मच्छीमार समाज एक आहे, एकमेकांच्या सुखदुःखात नेहमी धावून जाताना दिसतो. परंतु अनधिकृत मासेमारीला मत्स्य विभाग आणि मत्स्योद्योग मंत्र्यांनी अभय दिल्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना संघर्ष करावा लागला. त्या संघर्षाला मत्स्योद्योग मंत्री आणि मत्स्य खातेच जबाबदार असल्याची टीका रश्मीन रोगे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page