बांदा-दाणोली राज्यामार्गाची तातडीने डागडुजी करा…

रियाज खान:तातडीने निर्णय न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन, बांधकाम विभागाला निवेदन सादर..

⚡सावंतवाडी ता.०३-: बांदा-दाणोली राज्यमार्गाची ठिकठिकाणी खड्डे पडून अत्यंत दुरावस्था झाली आहे. खड्डे चुकविताना दिवसेंदिवस वाहनांच्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या मार्गाची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी शिवसेनेचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बांदा दाणोली हा मार्ग पर्यटकांना गोव्याकडे जाण्यासाठी कमी अंतराचा आहे. त्यामुळे या मार्गावरून दररोज हजारो गाड्या धावत असतात. मात्र, सध्या या रस्त्याची ठिकठिकाणी खड्डे पडून दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांमुळे अनेक अपघातही होत आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे बुजवण्याची कोणतीही कार्यवाही करत नसल्याने वाहनचालक व नागरिकांमध्ये संताप आहे.
सदर गंभीर प्रश्नाकडे रियाज खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे. सदर रस्त्याची तातडीने डागडूजी करावी किंवा संपूर्ण रस्ता नव्याने डांबरीकरण करावा अशी मागणी त्यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करणारा असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी शब्बीर मणियार, कौस्तुभ गावडे, सागर धोत्रे, साहिल खोबरेकर, राहुल माने आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page