⚡मालवण ता.११-: मालवण मधील सागरी महामार्ग येथे झालेल्या रिक्षा आणि कार यांच्यातील अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकअनिल यशवंत कासले (५४, मूळ रा. ईळये, ता. देवगड, सध्या रा. कलमठ, ता. कणकवली) याच्या विरोधात मालवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हा अपघात रविवारी दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी घडला होता. रिक्षा चालक आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन बिबवणे ते कांदळगाव असा प्रवास करीत होते. या अपघातात कार व रिक्षा यांच्या धडकेत रिक्षा रस्त्यालगतच्या मळ्यात कलंडून रिक्षेतील कारचालकासह रिक्षेमधील भालचंद्र नागवेकर, वर्षा नागवेकर, ईशान नागवेकर हे जखमी झाले होते. या प्रकरणी रिक्षा चालक अशोक अर्जुन लटम (५७, रा. वेतोरे-मार्गेवाडी, ता. वेंगुर्ले) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कार चालक अनिल यशवंत कासले याच्या विरोधात मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
