तर बांधकाम सल्लागार डॉ. पाटील याला न्यायालयीन कोठडी..
⚡मालवण ता.१०-: मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे व बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने आज दुपारी पुन्हा मालवण न्यायालयात हजर करण्यात आले. यामध्ये जयदीप आपटे याला दि. १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तर पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाटील याची सावंतवाडी कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे.
राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर प्रथम डॉ. पाटील याला अटक करून पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर आपटे याला अटक केल्यावर या दोघांनाही १० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडीची मुदत संपल्याने या दोघांनाही कडेकोट पोलीस बंदोबस्तात पुन्हा मालवण न्यायालयात हजर करण्यात आले.
मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याची अजून चौकशी करायची असल्याने सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार न्यायाधीश एम. आर. देवकाते यांनी आपटे याला १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तर चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
सरकारी अभियोक्ता ॲड. तुषार भणगे म्हणाले, राजकोट किल्ला येथील पुतळा कोसळल्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याची पूर्ण चौकशी झालेली नाही. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा पोलिसांकडून तपास व्हायचा आहे. तसेच लॅपटॉप अन्य साहित्य जप्त करायचे आहे. यांसह अन्य बाबींवर युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने जयदीप आपटे याला १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी पोलीस या प्रकरणाच्या तपासासाठी त्याला पुन्हा ताब्यात घेऊ शकतात असेही ॲड. भणगे यांनी स्पष्ट केले.
