बांदा दिनांक –
भारतात प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या हा विकासातील फार मोठा अडथळा आहे. चीनला मागे टाकून भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. भारतात श्रमशक्तीचा सुयोग्य वापर होत नसल्यामुळे दारिद्र्य, बेरोजगारी, गुन्हेगारी या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आजच्या युवा पिढीने याचा गांभीर्याने विचार करून भविष्यात लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रा. सुधीर न्हावेलकर यांनी केले.
येथील गोगटे वाळके महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सुधीर न्हावेलकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ११ जुलै १९८७ रोजी जगाची लोकसंख्या पाच अब्ज झाली. सातत्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचे गांभीर्य लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या नियंत्रण दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. मुलामुलींचे समान संरक्षण, महिला सक्षमीकरण, लैंगिक शिक्षण, मूलभूत प्राथमिक आरोग्य ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लोकसंख्या नियंत्रण दिन साजरा केला जातो असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दत्तगुरु जोशी होते. आपल्या भागात श्रमशक्तीचा योग्य वापर होत नाही. लोकसंख्या जास्त असूनही कुशल कामगारांची कमतरता हा प्रश्न नेहमीच भेडसावतो. म्हणूनच स्थानिक श्रमिकांना कौशल्याधारित शिक्षण देऊन त्यांचा रोजगाराचा प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविणे गरजेचे आहे असे अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. जोशी म्हणाले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. रश्मी काजरेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एम. एन. वालावलकर यांनी केले. तर आभार प्रा. प्रसाद जाधव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक उपस्थित होते.
