पालकांची नाराजी ; सरपंचाचे वेधले लक्ष..
बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरातील मध्यवर्ती भागात भर वस्तीत आलेल्या बांदा देऊळवाडी येथील अंगणवाडीच्या आवारात साफसफाई नसल्याने तसेच मद्याच्या बाटल्यांचा खच असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. येथील गुरुदत्त कल्याणकर यांनी ही गंभीर बाब बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या निदर्शनास आणून देत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सरपंच नाईक यांनी ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, रुपाली शिरसाट, तनुजा वराडकर यांच्यासह याठिकाणी येत पाहणी केली. त्यावेळी येथील परिस्थिती व समस्या पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. याठिकाणी रात्रीच्या वेळी पार्ट्या होत असल्याने दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. तसेच परिसरात साफसफाई नसल्याने झाडाझुडपाची वाढ झाली होती. यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. रात्रीचे प्रकार रोखण्यासाठी बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांना पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त घालण्याची मागणी सरपंच नाईक यांनी केली.
यावेळी मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत, अंगणवाडी सेविका रतन सावंत, मदतनीस आरोही कासकर, जगन्नाथ सातोसकर, चंद्रकांत कदम, जहूर शेख, राघवेंद्र कासकर आदी उपस्थित होते.
