विजय जावळे यांच्या ‘लेकमात ‘ कादंबरीला व डॉ अनिल धाकू कांबळी यांच्या ‘ इश्टक ‘ काव्यसंग्रहाला पुरस्कार…

⚡कणकवली ता.२८-: समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणाऱ्या काशिराम आत्माराम साटम स्मृती समाज साहित्य कादंबरी पुरस्कारासाठी हर्मिस प्रकाशनाने (,पुणे) प्रकाशित केलेल्या कादंबरीकार विजय जावळे (बिड) लिखित ‘ लेकमात ‘ या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. तर प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या भूमी काव्य पुरस्कारासाठी पार पब्लिकेशनतर्फे (मुंबई) प्रकाशित करण्यात आलेल्या कवी डॉ अनिल धाकू कांबळी (नांदगांव – कणकवली) यांच्या ‘ इश्टक ‘ या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, कार्यवाह वैभव साटम यांनी दिली.
पुरस्कार निवडीसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस, समीक्षक नितीन रिंढे आणि रणधीर शिंदे यांनी काम पाहिले. मुंबई येथे डिसेंबर मध्ये होणाऱ्या समाज साहित्य संमेलनात सदर पुरस्काराने श्री जावळे आणि डॉ.कांबळी यांना गौरविण्यात येणार आहे.
समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी काशिराम आत्माराम साटम स्मृती समाज साहित्य पुरस्कार मराठीतील मागील चार वर्षांतील सर्वोत्कृष्ट कादंबरी किंवा कथा संग्रहाला दिला जातो. यावर्षीच्या सदर पुरस्कारासाठी बीड येथील लेखक विजय जावळे यांच्या लेखमात या कादंबरीची निवड करण्यात आली. लेकमात ही कादंबरी समस्या प्रधान सामाजिक आकलन नोंदवणारी असून ऊस तोडणी कामगारांची खोलवरची समज या कादंबरीमुळे वाचकाला येते.यामुळे सदर कादंबरीचा समाज साहित्य पुरस्काराने गौरव करण्यात आला असल्याचे मत परीक्षकांनी नोंदवले आहे. तर कवी डॉ अनिल धाकू कांबळे यांच्या ” इष्टक ” काव्यसंग्रहातील कविता धर्माच्या पलीकडील नातेसंबंधांना महत्त्व देत असून संवेदनशील समाज बांधणीला अधोरेखित करते.आज धर्माचे ध्रुवीकरण चाललं असताना अशाच स्नेहभाव जपणाऱ्या लेखनाची गरज असल्यामुळेच या संग्रहाची भूमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असेही परीक्षण समितीने म्हटले असल्याचीही माहिती श्री मातोंडकर आणि श्री साटम यांनी दिली.

You cannot copy content of this page