दिल्लीतील मेरी माटी- मेरा देश मोहिमेसाठी मालवणातून ऐश्वर्य मांजरेकर व भाग्यश्री मांजरेकर यांची निवड…

⚡मालवण ता.२६-: मेरी माटी- मेरा देश या उपक्रमाचा अंतिम सोहळा १ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व १८ जण करणार आहेत. यासाठी मालवण मधून युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र मालवण तालुका समन्वयक व व्हिक्टर डांन्टस लॉ कॉलेजचा विद्यार्थी ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर व शिक्षा समागम दिल्ली G20 ची सहभागी भाग्यश्री जनार्दन मांजरेकर यांची निवड झाली आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे समारोपीय पर्व सुरु असून ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम देशभरात अतिशय उत्साहात राबविला जात आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ‘वसुधा वंदन’, ‘शिलाफलकम्’, ‘पंचप्रण शपथ’, ‘शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान’ असे नानाविध उपक्रम राबविण्यात आले. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वांना मातृभूमी प्रेमाच्या एकाच धाग्याने जोडणारा ‘अमृत कलश यात्रा’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. जिल्ह्यातील ग्राम स्तरावर ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२३ रोजी अमृत कलश यात्रा काढून घरोघरी माती गोळा करण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, सर्व पंचायत समिती, सर्व ग्रामपंचायत, शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. दिल्लीत अमृत वाटिका तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ७ हजार ५०० कलशांमधून माती घेऊन अमृत कलश यात्रा काढण्यात येणार असून ही अमृत वाटिका एक भारत श्रेष्ठ भारत या वचनबद्धतीचे प्रतीक आहे. २७ ऑक्टोबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे कलश घेऊन उपमुख्यमंत्री संसद सदस्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी अंतिम सोहळ्याचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले आहे. या अंतिम सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व ऐश्वर्य मांजरेकर व भाग्यश्री मांजरेकर मालवण तालुक्यामधुन करणार आहेत. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

You cannot copy content of this page