राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी घेतला निर्णय : मच्छिमार नेते तथा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मानले आभार_
*💫मालवण दि.१०-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मच्छीमार कुटुंबातील प्रत्येक क्रियाशील सदस्याला मत्स्य पॅकेजचा लाभ देण्याचा निर्णय राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी घेतला आहे. त्यामुळे समस्त मच्छिमारांच्यावतीने आपण आमदार वैभव नाईक यांच्यासह मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांचे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया मच्छिमार नेते तथा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी व्यक्त केली आहे. शासनाने मच्छीमारांसाठी जाहीर केलेल्या मत्स्य पॅकेज संदर्भात जाचक अटी शिथिल व्हाव्यात यासाठी आम. वैभव नाईक यांच्या मागणीनुसार मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार प्रतिनिधींची मंत्रालयात घेतलेली बैठक मच्छीमारांना न्याय देण्यास महत्वाची ठरल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शासनाने मच्छीमारांना नुकसान भरपाईपोटी जाहीर केलेल्या मत्स्य पॅकेजमध्ये अनेक जाचक अटी असल्याने यात अनेक मच्छीमारांना या पॅकेजचा लाभ घेताना अडचणी भासत होत्या. त्यामुळे मच्छीमारांनी याप्रश्नी आम. वैभव नाईक यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार आम. नाईक यांनी पुढाकार घेत मत्स्यव्यवसाय मंत्र्यांचे लक्ष वेधले. यात डिसेंबर महिन्यात मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांची पालकमंत्री उदय सामंत व आम. वैभव नाईक यांच्या पुढाकाराने शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख जोगी, संदेश पारकर यांनी मंत्रालयात भेट घेत सविस्तर चर्चा केली होती. या बैठकीत मत्स्यपॅकेज संदर्भात मच्छीमारांच्या समस्या मांडण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी मच्छीमारांना या पॅकेजचा लाभ मिळावा यासाठी काही जाचक अटी शिथिल केल्या आहेत. तसा निर्णय शासनाने घेतल्याने आता या मत्स्य पॅकेजचा लाभ मच्छीमारांना अधिक सुलभ घेता येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत, आम, वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील मच्छीमारांना आता या मत्स्य पॅकेजचा लाभ सुलभ मिळणार असून मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख, पालकमंत्री सामंत, आम. नाईक तसेच मत्स्य आयुक्त राजेंद्र जाधव यांचे हरी खोबरेकर व बाबी जोगी यांनी मच्छीमारांच्यावतीने आभार मानले आहेत.
