*💫मालवण दि.१०-:* क्यार व अन्य वादळ सदृश्य स्थितीमध्ये राज्यसरकार मार्फत मच्छीमाराना मंजूर झालेल्या सानूग्रह अनुदानातील सर्व त्रुटी दूर कराव्यात आणि नंतरच आमदार वैभव नाईक यांनी श्रेयाचे राजकारण करावे असे टीकात्मक आवाहन भाजपचे जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे. क्यार व महाचक्रीवादळग्रस्त व नंतर आलेला कोरोना व्हायरस मुळे जिल्ह्यातील २५००० पेक्षा जास्त मच्छीमार कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. यासाठी राज्य सरकारने तुटपुंजी मदत करण्याचे ठरवली असून त्यासाठी जे निकष आहेत त्यामुळे ५०%पेक्षा जास्त कुटुंबातील व्यक्तीना लाभ मिळणार नाही. यामध्ये शेंडी, कांडाला पध्दतीने मासेमारी करणाऱ्या कुटुंबाचा समावेश नाही. एका पेक्षा जास्त नौका नावावर असल्यास एकाच नौकेस सानुग्रह अनुदान मिळणार आहे, तसेच या नौकेवर जाणाऱ्या कामगारांसाठी कुठलाही लाभ मिळणार नाही. वास्तविक पाहता आज बहुतांश मच्छीमार व्यवसायीकांच्या एका पेक्षा जास्त होड्या नावावर आहेत. त्या प्रत्येक नौकेवर स्वतंत्र कामगार काम करत आहेत. ते या मध्ये समाविष्ट करण्यात आले नाही आहेत. तसेच कित्येक नौकाधारकांनी मत्स्यव्यवसाय कार्यालय मध्ये नौका परवानासाठी अर्ज सादर केला होता, परंतु स्थानिक कार्यालयाकडून परवाना वेळेत न मिळाल्यामुळे मच्छीमार या अनुदानापासून वंचित राहणार आहेत. या सर्व गोष्टीची महिती स्थानिक आम. वैभव नाईक यांनी घ्यावी. मच्छीमार समाजाची दिशाभूल करू नये. तसेच आताच स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यावसाईकांस घेतलेला निर्णय हा राज्यसरकारने स्वतःचीच चूक सुधारण्याचे काम केले आहे, त्यामुळे याचे श्रेय न घेता या पॅकेज मध्ये अजून ज्या त्रुटी आहेत त्या मार्गी लावायचे काम आम. वैभव नाईक यांनी करावे, असे आवाहन भाजपचे जिल्हा प्रवक्ते बाबा मोंंडकर यांनी केले आहे.
आम. नाईक यांनी मत्स्य पॅकेजमधील त्रुटी दूर करून नंतरच श्रेयाचे राजकारण करावे-:बाबा मोंडकर…
