मालवणात झिम्माड साहित्य कला महोत्सव संपन्न
⚡मालवण ता.२०-: कविता कशी असावी, कशी लिहावी इथं पासून ते आजपर्यंतच्या ज्येष्ठ कविंच्या व नव कविंच्या कवितांचा पाऊस पाडत, त्यावर विचारांचा उहापोह करत मालवण येथे पार पडलेल्या झिम्माड महोत्सवात उपस्थित साहित्यिक कवितांच्या पावसात झिम्माड होऊन रंगून गेले. या दोन दिवसीय महोत्सवात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील साहित्यिकांनी झिम्माड च्या व्यासपीठावर एकत्र येऊन आपापल्या साहित्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
कायद्याने वागा लोकचळवळीशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेच्यावतीने मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे ‘झिम्माड’ – मराठी कवितेच गणगोत हा दोन दिवसीय कला- साहित्य महोत्सव पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक महेश केळूसकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उदघाटक लेखिका रश्मी कशेळकर, महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेच्या अध्यक्षा वृषाली विनायक, कायद्याने वागा लोक चळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर, महोत्सवाचे स्वागताध्यक्ष किशोर कदम, गीतकार डॉ. विनायक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महोत्सव संपन्न झाला.
या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शनिवारी सायंकाळी ‘ऐसपैस’ हा मुक्तसंवाद कार्यक्रम लता गुठे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन त्यात कवी व साहित्यिकांनी सहभाग घेत कविता सादर केल्या. तर रात्री डॉ. राजेंद्र राठोड व डॉ. नरसिंग इंगळे यांचा ‘स्टेथोस्कोप’ हा आरोग्य विषयक परिसंवाद संपन्न झाला. तर रविवारी उदघाटनाच्या कार्यक्रमांनतर कॅनव्हास हा कार्यक्रम होऊन त्यात चित्रकार नामानंद मोडक व केशव कासार यांच्याशी कवी प्रथमेश पाठक यांनी सुसंवाद साधला. त्यानंतर ‘अभिव्यक्तीची ऐशीतैशी’ हा कार्यक्रम झाला. दुपारी पहिले कवी संमेलन अरुण गवळी यांच्या अध्यक्षतेखाली व दुसरे कविसंमेलन शशिकांत तिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
या महोत्सवात सरिता पवार, कल्पना मलये, सिद्धार्थ तांबे, राजेश कदम, सुधीर चित्ते, प्रवीण बांदेकर, कुंदा प्र. नी., प्रतिभा सराफ, मंगेश सातपुते, रुजारिओ पिंटो, राजश्री हिरा मधुकर, सिरत सातपुते, अनुजा जोशी, वीरधवल परब, गोविंद काजरेकर, आनंद लोकरे, वृषाली विनायक, प्रथमेश पाठक, कविता राजपूत, कल्पना बांदेकर, प्रिया मयेकर, जीतेंद्र लाड, नंदू सावंत, सोनाली जाधव, कविता मोरवणकर, अजय कांडर, अनिल कांबळी, ज्योत्स्ना राजपूत, शिवराम भोंडेकर, श्रीकांत पेटकर, शालिनी आचार्य, संजय शिंदे, संध्या लगड, सुनील शिरसाट, जयश्री देशमुख, विशाल अंधारे, सुधाकर चव्हाण, जनार्दन सताणे, नितीन शेठ, संदीप जालगांवकर, शरद कुऱ्हाडे, संदीप वाघ, संग्राम दावनगावे, नीलेश शिनलकर, संगीता लोहारे, सुहास मळेकर, राकेश पद्माकर मीना, कपिल खंडागळे, नीलम जाधव, प्रतीक्षा बनसोड, ओमकार परब, सुधा लोकरे, अनिल सावंत, सुनील देवळेकर आदी साहित्यिक व साहित्य प्रेमी सहभागी झाले होते.
