जी – २० शिखर परिषदेचे औचित्य:मालवण नगरपरिषदेचे आयोजन

चिवला बीचवरील स्वच्छ्ता मोहिमेला मोठा प्रतिसाद

मालवण (प्रतिनिधी)

आंतरराष्ट्रीय स्तरावरील G-20 शिखर परिषदेच्या अंतर्गत आज मालवणच्या चिवला बीचवर राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेला मालवणातील नागरिक तसेच पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मालवण नगरपालिकेच्या आयोजनाखाली आणि जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या स्वच्छता मोहिमेत सुमारे ४०० जणांनी सहभाग घेत चिवला बीचवरील विविध प्रकारचा सुमारे दीड टन कचरा गोळा केला.

G- 20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर देशभरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून या कार्यक्रमाचा भाग म्हणून समुद्र किनारे, सागरी जैवविविधता यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत जागतिक पातळीवर लक्ष वेधण्याच्या उद्देशाने जगभरातील काही निवडक समुद्र किनाऱ्यावर आज स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता मोहिमेत भारतातील एकूण ३७ किनाऱ्यांसह जगभरातील इतर १९ समुद्र किनाऱ्यांचा समावेश होता. तर महाराष्ट्रातील निवड झालेल्या एकूण चार समुद्र किनाऱ्यांमध्ये मालवणच्या चिवला बीचचा समावेश होता.

त्यानुसार आज सकाळी सकाळी ६ वाजल्यापासून या स्वच्छता मोहिम कार्यक्रमांस सुरुवात होऊन प्रथम नगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले विविध कार्यक्रम सादर झाले. तसेच योग प्रशिक्षिका सौ. दीपा वनकुद्रे यांच्या योगज्योती या ग्रुपतर्फे सौ. दीपा वनकुद्रे, सौ. सायली पाटकर, सौ. अनुष्का चव्हाण, सौ. संस्कृती बांदकर, सौ. नंदिनी गावकर यांनी नऊवारी साड्या परिधान करून गाण्याच्या तालावर योगासने सादर करत योगा विषयी जनजागृती केली. यानंतर सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ घेतल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला.

किनाऱ्यावरील प्लास्टिक कचऱ्याबाबत लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे, प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेबाबत एक पाऊल टाकत स्वच्छतेतून कसा बदल घडवू शकतो, हे जाणून घेतले पाहिजे असे यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी सांगितले. तर या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी चिवला समुद्र किनाऱ्याची झालेली निवड मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे, असे यावेळी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी सांगितले.

यावेळी मालवण मधील बहुसंख्य पर्यावरण प्रेमी, विद्यार्थी, राजकीय पुढारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, बचत गटाच्या महिला या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी बीचवर असलेल्या पर्यटकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कचरा गोळा केला. सहभागी झालेल्याना हॅन्डग्लोव्हज, मास्क पुरविण्यात आले होते. तसेच सहभागी सर्वांना सहभाग प्रमाणपत्र व कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले.

यावेळी सुमारे दीड टन कचरा गोळा करण्यात आला. या कचऱ्याचे प्लास्टिक, धातू, ओला व सुका कचरा यामध्ये वर्गीकरण करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे, पोलीस निरीक्षक विजय यादव, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, नगरपालिकेचे शहर समन्वयक निखिल नाईक, अभियंता सुधाकर पाटकर, सोनाली हळदणकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, मंदार केणी, पूजा सरकारे, ममता वराडकर, आकांक्षा शिरपूटे, शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे, तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, भाई कासवकर, प्रमोद कांडरकर, अगोस्तीन डिसोजा, भाजयुमो शहराध्यक्ष ललित चव्हाण आदी व इतर बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page