⚡मालवण ता.०८-: कोळंब ग्रामपंचायत येथे रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी सरपंच सौ. सिया धुरी व कार्यकारीणीतर्फे कोळंब ग्रामपंचायत हद्दीतील पाणी प्रश्न व स्ट्रीट लाईट साठी आवश्यक निधीच्या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले. यावर खासदार व आमदार यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
सरपंच सिया धुरी यांच्याकडून खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यावेळी उपसरपंच विजय नेमळेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, महिला आघाडीच्या दीपा शिंदे, श्वेता सावंत, उमेश चव्हाण आदी व इतर उपस्थित होते.
कोळंब गावात गेली पंचवीस वर्षे पाण्याची समस्या कायम असून गावात प्रत्येक वाडीत पाण्याच्या टाक्या बसाविणे व पाईप लाईन दुरुस्ती करणे यासाठी ६ लाख रुपये निधीची गरज आहे. तसेच गावातील स्ट्रीटलाईट नवीन बसविणे व दुरुस्त करणे यासाठी ४ लाख रुपये निधीची गरज आहे. असा एकूण १० लाखाचा निधी आपल्या आमदार व खासदार फंडातून मिळावा, अशी मागणी सरपंच सौ. धुरी यांनी निवेदनातून खास. राऊत व आम. नाईक यांच्याकडे केली. यावर आवश्यक निधी देण्याची ग्वाही खास. राऊत व आम. नाईक यांनी दिली.
