वाहनचालकांना सहन करावा लागतो मनस्ताप
⚡मालवण ता.१०-: धार्मिक पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या आचरे येथील संस्थानकालीन इनामदार श्री देव रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या आचरा देवूळवाडी रस्त्याची पूर्णता दुर्दशा झाली असून यात कमी म्हणून की काय एका खाजगी ठेकेदाराने रस्त्यावर टाकलेली खडी तशीच ठेवल्याने वाहनचालकाबरोबरच पादचाऱ्यांनाही या रस्त्यावरून ये- जा करताना कसरत करावी लागत असल्याने हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा ठरला आहे.
दरम्यान, दुर्दशा झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आचरा देवूळवाडी, डोंगरे वाडी ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
देवगड फाटा ते रामेश्वर मंदिराकडे जाणारया रस्त्याची पूर्णतः दुर्दशा झाली असून ठिक ठिकाणी रस्त्यावर चर पडल्याने रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे.
आचरा डोंगरे वाडी, देवूळवाडी मेस्त्रीवाडी हा जास्त वस्तीचा भागात जाण्यासाठी याच रस्त्यावरुन जावे लागते.तसेच ऐतिहासिक रामेश्वर मंदिरामुळे दर्शनासाठी येणारया भाविकांचा कायम ओढा या रस्त्यावरून असतो.यामुळे याभागात कायमच वर्दळ असते. दुरावस्था झालेल्या या रस्त्यावरून वाहतूक करणे वाहनचालकांना मोठ्या कष्टाचे बनले आहे. परीणामी रिक्षा चालक याभागात रिक्षा नेण्यासाठी नाखूषच असतात. याचा फटका या भागातील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. गेली दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी होवूनही रस्ता दुरुस्ती बाबत शासन, प्रशासन उदासिन असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. हा रस्ता तातडीने न झाल्यास देवूळवाडी मेस्त्री वाडी, डोंगरे वाडी ग्रामस्थ आक्रमक बनण्याचा इशारा येथील ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे
