कृषी समितीची सभा : यांत्रिकीकरण योजनेसाठी वाढीव निधी देण्याची मागणी
*💫सिंधूदुर्गनगरी दि.०४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र सामाईक क्षेत्रातील शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ घेता येत नाही. परिणामी त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे फळ पीक विमा योजनेतील वैयक्तिक सात बाऱ्याची अट शिथिल करून त्यात सामाईक क्षेत्राचा समावेश करावा असा ठराव आजच्या कृषी समिती सभेत घेण्यात आला. तसेच यांत्रिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव जास्त असल्याने शासनाने या योजनेसाठी वाढीव निधी द्यावा अशी मागणी सभेत करण्यात आली. जि. प. कृषी समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती तथा जिप उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण, समिती सदस्य रणजित देसाई, गणेश राणे, संजय देसाई, सुधीर नकाशे, महेंद्र चव्हाण, अमरसेन सावंत, प्रीतेश राऊळ, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
