तक्रारदाराचे नाव वैभव नाईक यांना माहित नाही मग नितेश राणेंना कसे समजले?

सतीश सावंत यांचा सवाल; भालेकरचा बोलविता धनी नितेश राणेच!

⚡कणकवली ता.१७-: आम.नितेश राणे यांनी बुध्दीभेद करण्याचे राजकारण प्रथम थांबवावे. एसीबीने आम. वैभव नाईक यांच्या विरोधात कोणी तक्रार दिली हे अद्याप जाहीर केलेले नाही आणि एसीबीचे अधिकारी शेवटपर्यंत तक्रारदाराच्या नावाबाबत गुप्तता पाळतात. असे असताना नितेश राणे यांना भालेकर या व्यक्तीने तक्रार केली असल्याचे समजते याचा अर्थ नितेश राणे हे भालेकरच्या संपर्कात आहेत असा होतो. असा टोला जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी आमदार नितेश आणि यांना लगावला आहे
कणकवली येथे पत्रकार परिषदेत सतीश सावंत बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक , उपजिल्हाप्रमुख राजू शेटये ,तालुकाप्रमुख शैलेश भोगले उपस्थित होते.

सतीश सावंत म्हणाले, आम. वैभव नाईक यांची जिल्ह्यात असलेली लोकप्रियता आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बाळगलेली एकनिष्ठता याचाच त्रास राणे भाजपाच्या नितेश राणे यांना होत आहे. म्हणूनच नितेश राणे हे हवेमध्ये आरोप करुन बुध्दीभेद करुन पक्षांतर्गत भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आपसात तक्रार करण्याची प्रवृत्ती शिवसेनेत नाही. ही प्रवृत्ती नितेश राणेंकडे असेल. आणि तक्रार जर भालेकरने केली असे समजत असेल तर भालेकरच्या संपर्कात नितेश राणे होते हे सिध्द होते. आणि कदाचित ती तक्रार नितेश राणे यानीच भालेकरला करायला लावली असेल असा त्याचा अर्थ होतो. खास.विनायक राऊत अशा प्रकारचे कोणतेही क्रुत्य करु शकत नाहीत याची नोंद नितेश राणे यांनी घ्यावी. त्यामुळे बुध्दीभेद करु पाहणाऱ्या नितेश राणे यांनी लक्षात घ्यावे की आम. वैभव नाईक हे कोणत्याही चौकशीला सामोरे जातील. त्यामुळे नितेश राणे यांनी त्याची चिंता करण्याची गरज नाही. भालेकर हे अनेकांची तक्रार करतात हे माहीत आहे मात्र या प्रकरणात भालेकर यानी तक्रार केली असल्याचे कसे समजले? हे नितेश राणे यांनी जाहीर करावे. त्या तक्रारदाराचे नाव अजुन पर्यंत वैभव नाईक यांना माहीत नाही मग ते नाव नितेश राणे यांना कसे समजले हेही त्यानी सांगावे. पक्षांतर्गत भांडणे लावण्याचा नितेश राणे यांचा डाव कदापिही यशस्वी होणार नाही. ट्विटरवर कुणी काय ठेवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.आज करोडो लोकांनी शिवसेनेची मशाल स्टेटस म्हणून ठेवली आहे. त्यामुळे आपल्या स्वाभिमान पक्षाची निशाणी विसरलेल्या नितेश राणे यांनी मशालीला आईस्क्रीमचा कोण समजू नये अन्यथा या मशालीने तुमचे तोंड भाजेल आणि स्वाभिमानची वज्रमुठ मशालीच्या ज्वालेने करपुन जाईल असे सांगताना आगामी काळात मतदारच याना आईस्क्रीम देवुन थंड करतील असे सतीश सावंत म्हणाले.

You cannot copy content of this page