मालवणी कवी श्री. रुजारीओ पिंटो यांचे प्रतिपादन
⚡मालवण ता.१२-: मानवी जीवनाच्या जडणघडणीत वाचनाला अनन्यसाधारण महत्व असून वाचनाने माणूस हा घडत असतो म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर अवांतर वाचनाची कास धरून आपली प्रगती साधावी असे प्रतिपादन कोमसापचे जिल्हा उपाध्यक्ष आणि मालवणी कवी श्री. रुजारीओ पिंटो यांनी येथे बोलताना केले.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या परीक्षेचा काळ सुरू असल्याने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने भंडारी ए. सो. हायस्कुल मालवण येथे कोमसाप शाखा मालवणच्या सहकार्याने साहित्यिक आपल्या भेटीला भाग २ या कार्यक्रमांतर्गत मालवणचे साहित्यिक आणि कोमसाप सिंधुदुर्गचे जिल्हा उपाध्यक्ष श्री रुजारिओ पिंटो यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे श्री रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच सरस्वती पूजन करून व माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे मुंबई कमिटीचे सह खजिनदार श्री. अभिमन्यू कवठणकर , प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. वामन खोत, पर्यवेक्षक श्री. एच. बी. तिवले, सहाय्यक शिक्षिका सौ अदिती शेर्लेकर ग्रंथपाल श्री. प्रफुल्ल देसाई, सहाय्यक शिक्षिका कु. सुनंदा वराडकर, सौ. संजना सारंग, आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक वामन खोत यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. तर उपस्थित पाहुण्यांचा परिचय सहाय्यक शिक्षिका सौ. शेर्लेकर यांनी करून दिला. यावेळी पिंटो यांचा अभिमन्यू कवठणकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात श्री. पिंटो यांनी मुलांनी आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे अवलोकन करून लिहिते व्हावे. सुरुवातीला चुकेल परंतु नंतर मात्र, त्यात सुधारणा होत जाऊन तुमच्या हातून चांगले साहित्य घडेल. वाचनाने माणूस घडत असतो असे पिंटो म्हणाले . यावेळी श्री. पिंटो यांनी आपल्या मालवणी कविता सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अभिमन्यू कवठणकर यांनी मुलांनी वाचाल तर वाचाल ही म्हण लक्षात ठेवून ग्रंथालयातील पुस्तके वाचावीत. जीवनात वाचनाला अनन्य साधारण महत्व आहे वाचनाने आपल्या बुद्धीत वाढ होते व आपण दुसऱ्यां पर्यंत आपले विचार पोहोचू शकतो असे त्यांनी सांगितले.
यावेळी शेवटी आभार कु .वराडकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई यांनी केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
