ह्यूमन राईटचे उपाध्यक्ष राजेश जाधव यांचे आवाहन
⚡कणकवली ता.१०-: सध्या जिल्ह्यातील नागरिकांना विविध प्रकारची आमिषे दाखवून आपल्या भूल-थापांच्या जाळ्यात ओढण्याचे व त्यानंतर पैशाची लुबाडण्याचे प्रकार वाढीस लागते आहेत.याकरिता गुन्हेगार रोज नवनवीन विविध प्रकारच्या युक्त्या – क्लृप्त्या यांचा वापर करीत आहेत. परंतु अशा प्रकारांना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. त्याकरीता जिल्हा पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेच.परंतु नागरिकांनी देखील अनोळख्या व्यक्तीवर सहजपणे तात्काळ विश्वास टाकून व कसल्याही प्रकारच्या आमिषाला किंवा प्रलोभनांना बळी पडून फसवणुकीची शिकार होऊ नये.
याउलट आपल्या बाबतीत अथवा आपल्या परिसरात एखादी संशयास्पद अथवा अनुचित प्रकार घडत असल्यास त्याबाबत लागलीच जवळच्या पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून निःसंकोचपणे आवश्यक ती संपुर्ण माहिती द्यावी.जेणेकरून पोलिस यंत्रणेला देखील तपास व दक्षता कामात मदत होईल व अशा प्रकारांना घटनांना आळा बसून नागरिकांना सुरक्षित जीवन जगता येईल.असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व राजेश जाधव यांनी केले आहे.
काल एका अज्ञात व्यक्तीने सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांना फोनद्वारे संपर्क साधून आपली पूर्वी भेट झाली असल्याचे सांगत ओळख भासवली.तसेच आपले एक महत्वाचे काम आहे असे सांगून त्याबाबतीत गोपनीयता बाळगण्याची सूचना जाधव यांना केली.जाधव यांनी त्या अज्ञात व्यक्तीचे संपूर्ण बोलणे ऐकून घेतले व त्या संभाषणातून प्राप्त झालेल्या माहितीबाबत साशंकता बाळगून त्याविषयी त्वरित संबंधित पोलीस यंत्रणेला सर्वतोपरी कल्पना दिली. संबंधित पोलीस यंत्रणेने देखील तात्काळ जाधव यांना मार्गदर्शन करून सावध केले. त्याबद्दल संबंधित पोलीस यंत्रणेचे आभार व्यक्त करून लोकहितास्तव व जनजागृतीस्तव सामाजिक कार्यकर्ते व ह्यूमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी जिल्हावासीयांकरिता दक्षतेचे आवाहन केले आहे.
