शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांचा प्रश्न;उद्योगमंत्री सामंत, शालेयमंत्री दीपक केसरकर यांना केला प्रश्न
सावंतवाडी : C 295 युद्ध मालवाहू विमान बांधणीचा हा महाकाय प्रकल्प गुजरातमधील धोलेरो येथे प्रस्तावित आहे पण तिथे प्रकल्प करण्यास कंपनी इच्छुक नाही, अशावेळी मोपा विमानतळा जवळ दोडामार्ग तालुक्यात हा प्रकल्प नक्कीच होऊ शकतो. मात्र यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री दिपक केसरकर आपलं राजकीय कौशल्य पणाला लावतील का, नुसतीच बोलाची कढी आणि बोलाचाच भात? असा प्रश्न शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे
ते म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारच्या गुजराती नेतृत्वाच्या दबावामुळे महाराष्ट्रात येणारा वेदांत फाॅक्सऑन प्रकल्प आता गुजरातला पळवून नेला जात आहे. महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत महाराष्ट्रात येऊ घातलेले असे अनेक प्रकल्प यापूर्वी देखील गुजरातला नेण्यात आले आहेत.
पण आता टाटा आणि Airbus विमान कंपनीचा २२००० कोटी रुपयांचा युद्ध मालवाहू विमान बांधणीचा प्रकल्प उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री दिपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणावा. हजारो रोजगार देण्याची क्षमता असलेला टाटा- एअरबस विमान कंपनीचा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यास सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न कायमचा मिटेल.पेट्रोकेमिकल रिफायनरी सारखा प्रदुषणकारी प्रकल्प येथील जनतेच्या माथी मारण्यापेक्षा एअरबस विमान कंपनीचा प्रकल्प येथे आल्यास जनता त्याचे स्वागतच करेल, असेही परुळेकर यांनी म्हटले आहे.
