केंद्रीय गृहरज्यमंत्री अजयकुमार मिश्रा
ओरोस ता.१३-:
नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी विविध योजना कार्यान्वित झाल्या असून त्यांचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी लोकसभा प्रवास योजना अंतर्गत लाभार्थी मेळाव्यात बोलताना केले.
भारतीय जनता पार्टी देशभरातील 144 लोकसभा मतदारसंघात ‘लोकसभा प्रवास योजना’ हे अभियान राबवित आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार स्वबळावर जिंकण्याची तयारी भाजपाने या अभियानाच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे तीन दिवसांच्या लोकसभा क्षेत्र दौऱ्यावर आलेले आहेत.
त्यानंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा आज ओरोस येथील इच्छापूर्ती सभागृह येथे पार पडला. या मेळाव्यामध्ये केंद्रिय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केंद्र सरकार मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी विविध योजनांच्या लाभार्थींनी आपल्याला मिळत असलेल्या योजनेतून आपल्या जीवनामध्ये कोणता सकारात्मक फरक पडला आणि नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विविध योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोचत असल्याने आपणास खूप फायदा झाला, असे नमूद केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त करणारी अनेक अभिनंदन पत्रे देखील मंत्री मिश्रा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
या मेळाव्यामध्ये या अभियानाचे लोकसभा क्षेत्र संयोजक अतुल काळसेकर यांनी सर्व योजनांचा आढावा मांडला. यावेळी सर्व लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी पुढच्या दौऱ्यामध्ये आपण जिल्हाधिकारी आणि त्यांच्या खात्याचे संबंधित अधिकारी यांच्याकडून आढावा घेऊन यामधील अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी व्यासपीठावर संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश सचिव प्रमोद जठार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राजू राऊळ, सरचिटणीस प्रभाकर सावंत, अशोक सावंत, संध्या तेरसे, भाई सावंत, रणजित देसाई, संजु परब, धोंडी चिंदरकर, विनायक राणे, दादा साईल, सुप्रिया वालावलकर, आरती पाटील, महेश मांजरेकर, देवेन सामंत आदी उपस्थित होते. प्रास्ताविक या मेळाव्याचे प्रमुख आनंद उर्फ भाई सावंत यांनी केले.
