केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी कणकवली येथे केले आवाहन
⚡कणकवली ता.११-: महाराष्ट्र राज्याचा विचार करता गेल्या अडीच वर्षात शिवसेना पक्षाने महाविकास आघाडी करून भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला होता आणि त्यामुळे ते लोकाभिमुख सरकार चालू शकले नाहीत. केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा जनतेला देऊ शकले नाहीत. आता महाराष्ट्र राज्यातही पुन्हा भारतीय जनता पार्टीचे सरकार आलेले आहे.त्यामुळे केंद्र सरकारच्या योजना अधिक जोमाने सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटितपणे काम करा. असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी कणकवली येथे बोलताना केले.
भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत केंद्रीय प्रवास मंत्री म्हणून गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. कणकवली येथे लोकप्रतिनिधींशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केंद्र सरकारच्या योजनेतील जनतेला अपेक्षित असलेले बदल आणि कारणे जाणून घेतली. लाभार्थ्यापर्यंत ही योजना अजून व्यापक स्वरूपात पोहोचाव्यात म्हणून काय केले जावे ? याबाबतचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे ,भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली ,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी , लोकसभा संयोजक अतुल काळसेकर,माजी आमदार प्रमोद जठार , भाजपा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, विधानसभा संयोजक मनोज रावराणे, विधानसभा सहाय्यक संयोजक संदीप साटम,महिला जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे ,नगराध्यक्ष समीर नलावडे,वैभववाडी नगराध्यक्ष नेहा माईंनकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री अजय कुमार मिश्रा म्हणाले ,
गेल्या आठ वर्षात मोदी सरकारने देशभरात जेवढ्या योजना राबवल्या तेवढ्या योजना गेल्या ६७ वर्षात कोणतेही सरकार राबवू शकले नाही. सामान्य गृहिणी पासून शेतकऱ्यापर्यंत आणि बेरोजगारापासून नोकरदारापर्यंत प्रत्येकाचा विचार करून मोदी सरकारने योजना सुरू केलेल्या आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील अनेक प्रश्न केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून आम. नितेश राणे व भाजपचे पदाधिकारी केंद्र सरकारकडे मांडत आहेत. आपण कार्यकर्ते म्हणून काम करत असताना पक्षाच्या योजना तळमळीने मांडता हे पाहून समाधान वाटते. पक्षासाठी असलेली निष्ठा आणि आत्मिकेने सुरू असलेले काम पाहिल्यानंतर या मतदारसंघात लोकसभेला भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून येणार यात तीळ मात्र शंका नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०१४ च्या पूर्वी देशात अनेक सरकारे होती.
मात्र सामान्य जनतेच्या गरजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणल्या. पीएम किसान योजना, घरकुल आवास योजना, उज्वला गॅस, अशा असंख्य योजना सांगता येतील ज्या देशात यशस्वीपणे चालू आहेत. कोरोनाच्या काळात प्रत्येकाला मोफत धान्य देऊन आमच्या सरकारने मदतीचा हात दिला. अशा यशस्वी पंतप्रधानांच्या यशस्वी योजनांची चर्चा कार्यकर्ते म्हणून जनतेपर्यंत न्या आणि नवनव्या योजना चे लाभ जनतेला मिळवून द्या असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केले. यावेळी भाजपा आमदार नितेश राणे यांनी चर्चेदरम्यान पदाधिकारी आणि केंद्रीय गृहमंत्री मिश्रा यांच्यात समन्वय साधला.
फोटो
कणकवली:भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत कार्यक्रमाचा शुभारंभ करताना केंद्रीय प्रवास मंत्री तथा गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा सोबत आम. नितेश राणे ,भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली , मनीष दळवी , अतुल काळसेकर, प्रमोद जठार , संदेश उर्फ गोट्या सावंत, मनोज रावराणे, संदीप साटम,संध्या तेरसे ,नगराध्यक्ष समीर नलावडे,वैभववाडी नगराध्यक्ष नेहा माईंनकर आदी
