बांदा/प्रतिनिधी
आज सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा परिसरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने बांदा शहरात पुराच्या शक्यतेने महसूलसह पोलीस व ग्रामपंचायतची यंत्रणा अलर्ट झाली आहे.
बांदा परिसरातील अनेक गावात पुरस्थिती निर्माण झाल्याने या गावांचा बांदा शहराशी संपर्क तुटला आहे. शहरातील आळवाडी मच्छिमार्केट ते कट्टा कॉर्नर शिवाजी चौक रस्ता पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक दिवसभर बंद होती. बांदा -सावंतवाडी मार्गांवर इन्सुली दारू कारखान्याजवळ रस्त्यावर तब्बल ३ फूट पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता.
बांदा शहर व परिसराला आज सकाळपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक सखल भागात पाणी शिरल्याने ग्रामीम भागातील छोट्या मोऱ्या व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. विलवडे सरमाळे येथील अनेक छोटे पूल पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्यावर्षीच्या पुरात विलवडे मळावाडीतील ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले होते. पुराच्या वाढत्या पातळीमुळे विलवडे मळावाडीतील ग्रामस्थ सतर्क झाले आहेत. घरातील वस्तू सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
दरम्यान, सरमळे नदीवरील पूलावरही पुराचे पाणी आले आहे. झाडे उन्मळून पडण्याचे प्रकारही ठिकठिकाणी घडले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला आहे. विलवडे धरणाचे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते विनायक सावंत यांनी सांगितले.
बांदा-सावंतवाडी मार्गावरील इन्सुली येथील दारू फॅक्टरीजवळ असलेल्या रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. बांदा पाटकर बागेजवळ रस्त्यावर पाणी आल्याने बांदा -वाफोली रस्ता बंद होता.
बांदा शहरातील आळवाडी कट्टा कॉर्नर रस्त्यावर गुडघाभर पाणी आल्याने येथील दुकानात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे स्थानिकांना सामान सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी कसरत करावी लागली. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. प्रशासन देखील याठिकाणी अलर्ट असून परिस्थितीवर २४ तास लक्ष ठेऊन आहे. पाणी भरण्याच्या शक्यतेने स्थानिकांना प्रशासनाच्या वतीने सातत्याने सूचना देण्यात येत आहेत.
