अमित सामंत; परिस्थिती समजून स्वबळाची भाषा करा
सावंतवाडी ता.२५-: सद्य परिस्थितीत समजून स्वबळाची भाषा करावी असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आपल्या मित्र पक्षांना दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असताना देखील आमच्या पक्षाचे सर्वच नेते महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यासाठी प्राधान्य देत असताना देखील, मित्र पक्षातील काही नेत्यांना स्वबळावर लढण्याची खुमखुमी आली असेल तर त्यांनी त्याची परीक्षा घ्यावी असा जोरदार टोला अमित सामंत यांनी आपल्याच महाविकास आघाडीतील दोन्ही मित्रपक्षांना लगावला आहे. आज सावंतवाडी येथे काँग्रेस आणि शिवसेनेतील काही आजी माजी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, निवडणुका ह्या पाच वर्षांनी येत असतात. त्यामुळे आम्ही देखील स्वबळावर लढण्याची तयारी केली असून, त्याचा प्रत्यय आज आम्ही दाखवून दिला आहे. यावेळी पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचा योग्य तो मान सन्मान केला जाईल असे आश्वासन देखील त्यानी यावेळी दिले आहे.
