Headlines

नव्या मच्छीमारी कायद्याबाबत पारंपारिक मच्छीमारांनी मानले आम.वैभव नाईक यांचे आभार

*⚡मालवण ता.०१-:* महाराष्ट्र राज्य सरकारने मासेमारी नियम व अधिनियम १९८१ या कायद्यात ४० वर्षानंतर सुधारणा करून नवा सुधारित कायदा पारीत केल्याने सरकार कौतुकास पात्र आहे. तसेच या मच्छीमारी कायद्यात सुधारणा होण्यासाठी पारंपारिक मच्छीमारांनी लढा दिला असतानाच मच्छीमार संघटनांच्या सहकार्याने सरकारकडे पाठपुरावा करून लढा देणाऱ्या आम. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश आले असे सांगत मालवण तालुका श्रमिक मच्छीमार संघ व सिंधुदुर्ग श्रमजीवी रापण संघाने पारंपारिक मच्छीमारांच्या वतीने आम. नाईक यांचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे आभार मानले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने ७२० कि. मी. लांबीच्या किनारपट्टीवर मासेमारी नियम व अधिनियम १९८१ च्या तरतूदी या तकलादू होत्या. त्यामुळे बेकायदेशीर मासेमारीमुळे पारंपारिक मच्छिमार नेहमी मत्स्यदुष्काळाच्या छायेत असायचा. त्याकरीता प्रसंगी पारंपारिक मच्छिमारांनी कायदा हातात घेवून लढा दिला. परंतु प्रत्येकवेळी शासनाने डोळेझाक केली.

पण आता या अधिनियमात बऱ्यापैकी सुधारणा करुन त्याचे कायद्यात रुपांतर करण्याकामी दोन्ही सभागृहात मान्यता दिली. एवढेच नव्हे तर राज्यपालांनी सुद्धा या सुधारीत विधेयकाला तात्काळ मंजूरी दिल्याने यापुढे बेकायदेशीर मासेमारीच्या भस्मासुराला आळा बसेलच, पण पारंपारिक मच्छिमारांना त्यांच्या रोजगाराचे संरक्षण मिळणार आहे. याकामी विद्यमान सरकार मच्छिमारांच्या कौतुकास पात्र आहे. त्याचप्रमाणे मालवण – कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने विविध मच्छिमार संघटनांच्या सहकार्याने सरकारच्या लक्षात आणून दिले व आपणही याकामी यशस्वी लढा दिला. त्यामुळे मालवण तालुका श्रमिक मच्छिमार संघ व सिंधुदुर्ग श्रमजिवी रापण संघाच्यावतीने सर्व पारंपारिक मच्छिमार आमदार नाईक यांचे ऋणी आहोत, असे दोन्ही संघटनांच्यावतीने छोटू सावजी, दिलीप घारे, बाबी जोगी, गंगाराम घाडी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page