कणकवली शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सत्ताधाऱ्यांना जाग केव्हा येणार?

विरोधी नगरसेवकांचा मुख्याधिकाऱ्यांना सवाल; निवडणूक आल्यावर रस्ते करणार का?

*⚡कणकवली ता.३०-:* कणकवली शहरातील प्रमुख दाटीवाटी असलेल्या प्रभाग क्र . १३ व शहरातील अन्य रस्ते खराब झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज नगर, गाडदेवी मंदिर नजीक, बिजली नगर, विठ्ठल भवन- भूमी अभिलेख रस्ता, दत्त मंदिर बांदकरवाडी या प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सत्ताधाऱ्यांना केव्हा जाग येणार?निवडणूक आल्यावर रस्ते करणार का? असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर यांनी उपस्थित केला. ही कामे तातडीने करा अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करताना विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी सांगितले,कि प्रहार ऑफिस व मराठा मंडळ रोड हा गेली कित्येक वर्षे खड्डे, चिखल , उखडलेली खड़ी व डांबर अशा स्थितीत आहे. तसेच या रस्त्यावरुन जाताना वाहन चालकांना व नागरिकांना तारेवरची कसरत करत जावे लागत आहे. तरी सदर रस्ता नुतनीकरण ( कारपेट ) व काँक्रिटीकरण करुन घ्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज नगर येथिल रस्ता मंजूर असल्याचे अवधूत तावडे यांनी सांगितले. तसेच गणेश चतुर्थी पूर्वी खड्डे बुजविण्याचे टेंडर काढण्यात आले. मात्र ते खड्डे बुजवले नाहीत त्यामुळे आता सिमेंट काँक्रीट ने रस्त्याचे खड्डे बुजवू नका अशी मागणी कन्हैया पारकर यांनी केली.कणकवली नगरपंचायतमार्फत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे हंगामी स्वरूपात फळ, फुले व भाजी मार्केट चालू करण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गर्दीचा विचार करून सर्व आवश्यक वस्तूंचा पुरवठा एकाच ठिकाणी व्हावा या हेतूने हे पाउल उचलले होते. परंतु सदर मार्केटची आखणी करताना चहुबाजूनी ग्रीन नेट लावून बंदिस्त करण्यात आलेले आहे. सदर कापडी आच्छादनामुळे व्यापारी वर्गाच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. तरी सदर कापडी आच्छादन हटवून मार्केट परिसर हा खुला करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

You cannot copy content of this page