आम नाईक यांच्या भूमिकेमुळे काही काळ वातावरण तंग : ग्रामस्थ लेखी मागणीवर ठाम
*⚡मालवण ता.१६-:* सागरी अतिक्रमणामुळे धोका निर्माण झालेल्या तळाशील गावच्या किनारपट्टीवर कायमस्वरूपी बंधारा व्हावा या गेल्या कित्येक वर्षाच्या मागणीकडे शासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे संतप्त बनलेल्या तळाशील च्या ग्रामस्थांनी आज अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी बेमुदत उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले. सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनाला भाजप, मनसे, तसेच गाबीत समाज संघटनेने पाठिंबा दिल्याने या आंदोलनाची तीव्रता वाढली होती. आंदोलकांची समजूत काढण्यासाठी आलेले आमदार वैभव नाईक यांनी येत्या शुक्रवार पासून तात्पुरत्या स्वरूपाच्या बंधाऱ्याचे काम सुरू करू असे आश्वासन दिले खरे परंतु, आक्रमक बनलेल्या ग्रामस्थांनी आमदारांचे आंदोलन धुडकावून लावत कायमस्वरूपी बंधाऱ्यांची मागणी लावून धरत प्रसंगी समुद्रात उतरून आंदोलन करू असा इशारा दिला. मात्र ग्रामस्थांच्या या मागणीवर आमदार निरुत्तर बनल्याने व त्यांनी माघारी परतण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे काहीसे वातावरण तंग बनले. यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सरतेशेवटी ठोस उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थांनी शुक्रवारी तात्पुरत्या बंधाऱ्याचे काम सुरू होईपर्यंत आपले उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. सागरी अतिक्रमणग्रस्त तळाशील गावच्या किनारपट्टीवर बंधारा नसलेल्या भागाची लाटांच्या तडाख्यात मोठी धूप झाली असून बंधारा व्हावा यासाठी स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे आज सकाळी ११ वाजल्यापासून हे उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी सरपंच आबा कांदळकर, तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष जयहरी कोचरेकर, धर्माजी कोचरेकर, संजय केळुसकर, संजय तारी, अजित केणी, स्वप्नाली तारी, प्रगती जुवाटकर, बंड्या खोत, रघुनाथ तांडेल, आदी व बहुसंख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. यावेळी जयहरी कोचरेकर यांनी तळाशील गावच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी बंधारा होण्यासाठी गेली अनेक वर्षे लढा देत असून शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज ग्रामस्थांवर उपोषण करण्याची वेळ आली आहे. बंधारा होण्यासाठी ग्रामस्थांनी एकजूट कायम ठेवावी असे सांगितले. या उपोषणाला मनसेचे नेते व अखिल भारतीय गाबीत महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर, गाबीत समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय धुरत, गाबीत समाज जिल्हा संघटक चंद्रशेखर उपरकर, गाबीत समाज तालुकाध्यक्ष डॉ.प्रमोद कोळंबकर, अरविंद मोंडकर, सहदेव साळगावकर, मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपुरकर, शैलेश अंधारी, सामाजिक कार्यकर्ते बंड्या खोत व मित्रमंडळ, भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सचिव महेश मांजरेकर यांनी उपस्थित राहत पाठींबा दिला. या उपोषणा दरम्यान दुपारी आम. वैभव नाईक यांनी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी यांच्यासह उपस्थिती लावली. यावेळी आम. नाईक यांनी तळाशीलचा प्रश्न लक्षात घेऊन जिल्हा आपत निधीमधून तळाशील समुद्र किनारी एक बंधारा तसेच नदीच्या किनारी संरक्षक भिंत असे दोन तात्पुरत्या स्वरूपाचे दोन बंधारे मंजूर करण्यात आले असून ही दोन्ही कामे येत्या शुक्रवारी पासून सुरू करण्यात येतील असे सांगितले. मात्र ग्रामस्थांनी तात्पुरत्या स्वरूपाचे बंधारे नको असे सांगत आमदारांवर टीकेची झोड उठवली. यावेळी आमदार नाईक यांनी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जयहरी कोचरेकर व प्रमुख ग्रामस्थांशी चर्चा करत या दोन बंधाऱ्यासह आणखी दोन तात्पुरत्या स्वरूपाचे बंधारे येत्या काही दिवसात मंजूर करू असे आश्वासन देत आंदोलनस्थळावरून जाणे पसंत केले. मात्र आमदार निघत असल्याचे लक्षात येताच काही महिलांनी आमदारांच्या गाडीकडे धाव घेतली. मात्र आमदारांची गाडी सुटल्याने आक्रमक महिलांनी हरी खोबरेकर यांना घेराव घालत जाब विचारला व आमदार ग्रामस्थांशी न बोलता का पळून गेले असा सवाल केला. यानंतर ग्रामस्थांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत आमदारांनी आमच्यासमोर येऊन माहिती द्यावी अशी मागणी लावून धरल्याने काही वेळाने आमदार नाईक पुन्हा आंदोलन स्थळी दाखल झाले. यावेळी आमदार नाईक यांनी तातडीने मंजूर केलेल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या दोन बंधाऱ्यांची कामे शुक्रवार पासून सुरू करण्यात येतील असे सांगत तात्पुरत्या स्वरूपाचे आणखी दोन बंधारे बांधण्यात येणार असून त्यातील एक आमदार फंडातून तर दुसरा पालकमंत्र्यांना कडे पाठपुरावा करून येत्या काही दिवसात मंजूर करण्यात येईल असे सांगत ग्रामस्थांच्या निर्णयाचा चेंडू ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जयहरी कोचरेकर यांच्याकडे टोलविला. यावेळी ग्रामस्थांनी तात्पुरत्या बंधाऱ्यांचे काम सुरू करण्याबाबत लेखी आश्वासन मागितले असता ते आमदार तसेच पतन अधिकाऱ्यांककडूनही पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांनी जोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपाच्या बंधाऱ्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार अस
