माजी आमदार भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांचा टोला
*💫कणकवली दि.०१-:* मुंबई-गोवा महामार्गावर अनेक कामे अपुरी असल्याने टोलची अंमलबजावणी करू नये अशी मागणी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे करणार्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांचा खरा चेहरा समोर आला आहे. कारण स्वतःच्या मुलाच्या नावाने टोल वसुलीसाठी कंपनी तयार करून आपल्या मुलाच्या रोजगाराचा विचार करणारे या मतदारसंघाचे खासदार मात्र कोकणातील दोन लाख तरुणांना रोजगार देणाऱ्या प्रकल्पाला विरोध करतात. त्यामुळे स्वतःचे हित पाहणाऱ्या खासदार विनायक राऊत यांचा पर्दाफाश झाल्याची घणाघाती टीका माजी आमदार भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी केली आहे. खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे टोलवसुलीची अंमलबजावणी करू नये अशी मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रमोद जठार यांनी श्री राऊत यांच्या या मागणीचा खरपूस समाचार घेतला. यावेळी श्री जठार म्हणाले, स्वतःच्या मुलाच्या नावाने टोलवसुलीची कंपनी स्थापन केल्यानंतर ती कंपनी ज्यावेळी जनतेसमोर आली त्यावेळी राऊत यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला. मात्र आता भविष्यात आपल्याला याचा राजकीय तोटा होईल हे लक्षात येताच खासदार विनायक राऊत हे दुसऱ्या कुणाच्यातरी नावे ही कंपनी स्थापन करण्याकरिता हालचाली करत असल्याचे ही आम्हाला समजले. त्यामुळे हायवेच्या टोल वसुलीसाठी दुसरी कंपनी स्थापन होईपर्यंत मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करण्यासाठीच खासदार विनायक राऊत यांनी आपल्याला वेळ मिळावा म्हणून ही मागणी केंद्रीय मंत्र्यांकडे केल्याचा आरोप प्रमोद जठार यांनी केला. परंतु खासदार साहेब “जो बूँद से गयी ओ हौद से नही आती” असे म्हणत श्री जठार यांनी खास.विनायक राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
