बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा परिणाम;हवामान खात्याने दिला होता अतिवृष्टीचा इशारा
*💫मालवण दि.१२-:* बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने हवामान विभागाने जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असताना मालवणात आज सायंकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. तर दिवसभर समुद्र खवळलेला राहिल्याने जोरदार लाटा किनाऱ्यावर उसळत होत्या. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने जिल्ह्यात जोरदार वारे व अतिवृष्टीची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने चार दिवसांपूर्वी वर्तविली होती. मात्र गेल्या तीन दिवसात हवामानातील बदलाचा तेवढासा परिणाम न जाणवता तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मालवणात आज दिवसभर वातावरण ढगाळ राहिले. मात्र समुद्र खवळल्याचे दिसून आले. समुद्र खवळल्याने जोरदार लाटा किनाऱ्यावर धडकत होत्या. सायंकाळपासून रिमझिम पाऊस सुरू झाल्यानंतर पावसाने मुसळधार रूप धारण केले. रात्रीपर्यंत हा पाऊस सुरू होता. अतिवृष्टीचा इशारा असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीकरिता जाऊ नये, असे आवाहन मत्स्य विभागाने केले आहे.
