Headlines

मालवण ग्रामीण रुग्णालयात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत पोषण व ॲनिमिया जनजागृती दिन उत्साहात साजरा…

मालवण, दि प्रतिनिधी :

सर्वसामान्य नागरिकांपर्यंत, विशेषतः महिला आणि बालकांपर्यंत आरोग्याचा संदेश पोहोचवून त्यांच्यात पोषणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘पोषण व ॲनिमिया जनजागृती दिन’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आगामी वर्षभर हे अभियान सातत्याने राबविले जाणार असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुधारण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, डॉ. संजय पोळ, डॉ. बालाजी पाटील, डॉ. प्रशांत बागडे आणि डॉ. नागेश नागवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी उपक्रमाच्या उद्देशाचे कौतुक करत अभियानाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दैनंदिन जीवनातील चांगल्या आहाराचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या काळात चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि अपुऱ्या आहारामुळे बालके व महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सेवा संकल्प अभियानाचा मुख्य गाभा हा गरोदर मातांचे आरोग्य सुधारणे हा आहे. या कार्यक्रमात उपस्थित गरोदर महिलांना आहाराविषयी सखोल समुपदेशन करण्यात आले. गर्भावस्थेत आई आणि बाळ दोघांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी लोहाचे प्रमाण योग्य असणे आवश्यक असते. यासाठी हिरव्या पालेभाज्या, गूळ, शेंगदाणे, खजूर आणि पौष्टिक धान्यांचा आहारात वापर कसा करावा, याची माहिती वैद्यकीय पथकाकडून देण्यात आली.
हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नसून, वर्षभर हे अभियान मालवण तालुका पातळीवर राबवले जाणार आहे. याअंतर्गत ग्रामीण भागातील महिला, गरोदर माता व बालकांची नियमित ॲनिमिया तपासणी केली जाईल. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना योग्य आहाराबाबत मार्गदर्शन केले जाईल. आवश्यकतेनुसार गरजू महिला आणि बालकांना लोह व फोलिक ॲसिडच्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येईल.
ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचवणे आणि कुपोषण व ॲनिमियासारख्या समस्या मुळापासून नष्ट करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

You cannot copy content of this page