मुंबईत घेतली सदिच्छा भेट: निवेदन केले सादर..
⚡सावंतवाडी, ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या वीजपुरवठा व इतर मूलभूत सुविधांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात येणार असून, आवश्यक निर्णय तत्काळ घेतले जातील, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
यासंदर्भात भाजपा युवा नेते विशाल परब यांनी मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध समस्या, नागरिकांच्या अडचणी तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
या निवेदनात रस्ते, पूल, वीजपुरवठा, मोबाईल नेटवर्क, पाणीपुरवठा तसेच पावसामुळे विस्कळीत झालेल्या अन्य मूलभूत सुविधांची तातडीने दुरुस्ती व कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
“जनतेच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील,” असा निर्धार भाजपा युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला.
