⚡सावंतवाडी ता.२६-: वरची मळेवाड – म्हापसेकरवाडी येथील शेतकरी गोविंद(बाबल) रघुनाथ मुळीक यांच्या मालकीच्या गायीच्या वासराला आज (शुक्रवारी) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत प्रथमेश मुळीक यांनी वनविभागाची संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे आजगाव वनपाल विजय दाते, पाडलोस वनरक्षक प्रकाश रानगिरे ,वनसेवक चंद्रकांत पडते तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृत वासराचा पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
यावेळी प्राथमिक पाहणीत गोठ्याच्या आजूबाजूला बिबट्याच्या पावलांचे ठसे ही मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचे दिसूनआले.
शेतकरी गोविंद मुळीक यांच्या घराशेजारीच हा गुरांचा गोठा असून , नेहमी प्रमाणे श्री. मुळीक यांनी सायंकाळी गुरांना चारा घालून गोठ्याचा दरवाजा बंद केला.मात्र आज शुक्रवारी सकाळी साडे तीन चार च्या सुमारास गोठ्यातील गुरांच्या ओरडण्याचा आवाजाने श्री .मुळीक जागे होत बाजूला असलेल्या गोठ्याकडे धाव घेत पाहिले तर समोर बिबट्याने तेथून पळ काढला,यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात मात्र वासराला आपला जीव गमावला लागल्याचे त्यांनी पाहिले. घरातील सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली.मात्र तोपर्यंत ते वासरू मृत झाले होते.
परिसरात बिबट्याचा वावर असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या वनविभागाच्या पथकाने ग्रामस्थांना रात्री व पहाटेच्यावेळेत एकटे बाहेर न पडता तसेच पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
