राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची मागणी
*💫सावंतवाडी दि.३०-:* सध्याची ७ ते ११ या अत्यावश्यक सेवेतील दुकानांची वेळ ही कोरोना प्रादुर्भाव वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याने जिल्हा प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करत सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यास मुभा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली आहे. दळवी म्हणाले, जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सध्याची ७ ते ११ ही वेळ कोरोना प्रादुर्भाव वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांना वाहतूकीची सोय नसल्याने सकाळी लवकर येण शक्य होत नाही. त्यामुळे १० ते ११ या वेळेत बाजारात गर्दी होते. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचेही पालन करणे शक्य होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांनी देखील योग्य तो निर्णय घ्यावा, जेणेकरून गर्दी टाळत कोरोनाची चेन तोडता येईल अशी आशा दळवी यांनी व्यक्त केली. याबाबत लवकरच जिल्हाधिकारी तसेच सरकारमधील नेत्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
