प्रा अरुण मर्गज:बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..
कुडाळ : विकासापासून वंचित असलेल्या दीनदुबळ्यांना, पददलितांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया. हीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल, असे उद्गार प्राचार्य अरुण मर्गज यांनी काढले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिवादन करताना ते बोलत होते.
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, प्रसाद कानडे,प्रा विजय, सुनील गोसावी, विशाल सावंत, संतोष पडते, चेतन गवळी,गजानन टारपे,व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. अरुण मर्गज म्हणाले, प्रज्ञा,शील, आणि करुणा या त्रिसूत्री आत्मसात करा. शिका आणि संघटित व्हा. असा आग्रह धरून आत्मोद्धारा करा. असा बहुमूल्य संदेश देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजही जगभरातील लोकांच्या आदरास पात्र ठरलेले आहेत. त्याचं कारण एकच आहे की, सामान्यातला सामान्य माणूस जोपर्यंत प्रगत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्यांना कोणत्याही देशाच्या स्वातंत्र्याची फळे चाखता येणार नाहीत. यावर त्यांचा विश्वास होता आणि त्यासाठी त्यांनी आजन्म प्रयत्न केले. हे त्यांचं कार्य लक्षात घेऊन जे आपले बांधव आहेत त्यांना आपण आपल्या परीने मदत करुया. जेणेकरून देशातील सामान्यातला सामान्य माणूस प्रगती करून समर्थ देश बनू शकेल.असे सांगत डॉ. बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली.
