सावंतवाडी : न्हावेली गावातील पार्सेकरवाडी ते कुंभारभाट परिसरातील मुख्य विद्युत लाईनवरील सुमारे १० ते १२ खांब जीर्ण व धोकादायक स्थितीत असल्याने ते तातडीने बदलण्यात यावेत, अशी मागणी उपसरपंच अक्षय गुंडू पार्सेकर यांनी निवेदनाद्वारे महावितरणकडे केली आहे.
हे खांब शेतजमिनीत उभे असून पावसाळ्यात पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात एक खांब कोसळल्यामुळे तब्बल तीन दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या घटनेची आठवणही निवेदनात करून देण्यात आली आहे.
यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जीर्ण खांब बदलून नवीन खांब बसवावेत, तसेच विद्युत लाईनजवळील झाडांची छाटणी करून लाईन मोकळी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या निवेदनाची दखल घेत उपअभियंता राक्षे यांनी लवकरच सर्वेक्षण करून संबंधित खांब बदलण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्यासह ओम पार्सेकर, सीताराम परब आदी उपस्थित होते.
