“येग येग चिऊताई…” या हाकेला प्रतिसाद देत घारपी शाळेचा हृदयस्पर्शी उपक्रम…

स्काऊट-गाईड व कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांकडून चिमण्यांसाठी घरटी व पाण्याची सोय..

⚡बांदा ता.०९-: एकेकाळी प्रत्येक अंगणात, प्रत्येक झाडावर आणि घराच्या कडेला सहज दिसणारी चिमणी आज हळूहळू आपल्यापासून दूर जात आहे. वाढते शहरीकरण, झाडांची कमतरता आणि उन्हाळ्याची तीव्रता यामुळे या छोट्या पक्ष्यांचे जीवन कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्काऊट-गाईड व कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी “येग येग चिऊताई…” या हाकेचे कृतीत रूपांतर करत एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविला.
उन्हाच्या कडक झळा सहन करणाऱ्या चिमण्या, साळुंकी यांसारख्या पक्ष्यांसाठी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात छोटी घरटी लावली आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली. विद्यार्थ्यांच्या लहानशा हातांनी तयार केलेली ही घरटी केवळ पक्ष्यांसाठी निवारा नसून, त्यांच्या मनातील प्रेम, माया आणि निसर्गाविषयीची जाणीव व्यक्त करणारी ठरली.
“येग येग चिऊताई…” म्हणत विद्यार्थ्यांनी झाडांच्या फांद्यांवर घरटी बांधली, मातीच्या भांड्यांमध्ये पाणी भरले आणि रोज त्याची काळजी घेण्याची जबाबदारीही स्वीकारली. या छोट्याशा कृतीतून विद्यार्थ्यांनी माणूस आणि निसर्ग यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा जपण्याचा प्रयत्न केला.
आज मोबाईल, संगणक आणि धावपळीच्या जगात हरवलेल्या बालपणाला या उपक्रमामुळे निसर्गाशी जोडणारा एक सुंदर धागा मिळाला. पक्ष्यांसाठी ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात एखादी चिमणी येऊन पाणी पिताना दिसली की विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद हा शब्दांत व्यक्त करता येणार नाही असा होता.
“उन्हाळ्याच्या दिवसांत पक्ष्यांना पाणी व सुरक्षित निवाऱ्याची मोठी गरज असते. ‘येग येग चिऊताई…’ म्हणत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून पक्ष्यांविषयीचे प्रेम व्यक्त केले, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, प्राणी-पक्ष्यांविषयी माया आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होते. विद्यार्थ्यांनी निसर्गाशी मैत्री करत असेच संवेदनशील उपक्रम सातत्याने राबवावेत,” असे मत मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी व्यक्त केले.
घारपी शाळेतील स्काऊट-गाईड व कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी राबविलेला हा छोटासा उपक्रम केवळ पक्ष्यांसाठी निवारा निर्माण करणारा नाही, तर माणुसकी, संवेदनशीलता आणि निसर्गप्रेम जपणारा ठरत आहे.शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमांसाठी शाळेचे मुख्याध्यापक जे.डी.पाटील सहकारी शिक्षक आशिष तांदुळे ,मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे, अंगणवाडी सेविका संजना गावकर ,मदतनीस अमृता कविटकर ,संचिता सावंत यांचे सहकार्य मार्गदर्शन मिळाले.

You cannot copy content of this page