⚡मालवण ता.०७-:
कालावल खाडीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा बंद करावा यासह अन्य मागण्यांसाठी तळाशील वासियांनी छेडलेल्या आंदोलनाचे स्वरूप आज अधिकच तीव्र बनले. मागण्या पूर्ण न झाल्यास खाडीपात्रात उड्या घेऊन जीवन संपवू असा इशारा देणाऱ्या तळाशीलच्या महिलांनी अखेर आज प्रशासनाशी चर्चा फिसकटल्याने सायंकाळी खाडीपात्रात उतरत आंदोलन अधिक तीव्र केले. यावेळी पाण्यात उतरलेल्या महिलांपैकी एक ज्येष्ठ महिला अत्यवस्थ बनल्याने तिला आचरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे या आंदोलनाची तीव्रता अधिकच वाढली आहे.
कालावल खाडी पात्रातील अवैध वाळू उपशावर कारवाई व्हावी, अशी मागणी करून प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याच्या विरोधात तळाशील ग्रामस्थांनी खाडी पात्रात होड्यांमध्ये बसून तसेच तळाशील किनारी बसून गेले काही दिवस आंदोलन छेडले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास मंगळवारी खाडीपात्रात उड्या घेऊन आमचे जीवन संपवू असा इशारा काल तळाशीलच्या महिलांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी नायब तहसीलदार व पोलीस अधिकारी चर्चेसाठी आले होते. यावेळी झालेल्या चर्चेत ग्रामस्थांनी बंदर निरीक्षक कारवाईसाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप रोष व्यक्त केला. यावेळी नायब तहसीलदार यांनी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे चर्चा घडवून आणली. मात्र आमच्या मागण्यांबाबत आम्हाला लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
दरम्यान या सर्व चर्चेत प्रशासनाकडून कोणत्याच मागण्या पूर्ण न झाल्याने संतप्त बनलेल्या महिला खाडीच्या पाण्यात उतरल्या. किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या नायब तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्षच महिला खाडीच्या पाण्यात उतरल्या. पाण्यात उतरून महिलांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खाडीत उतरलेल्या दोन महिलांची प्रकृती यावेळी अत्यवस्थ बनली. त्यांना पाण्याबाहेर आणत तातडीने आचरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेमुळे ग्रामस्थ अधिक आक्रमक बनले असून आंदोलन तीव्र केले आहे. गेले काही दिवस आम्ही आंदोलन करत असताना आमच्या मागण्यांचा कोणताही विचार प्रशासनाने केलेला नाही. प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.
