ग्रामस्थ आक्रमक:भाजपच्या विशाल परब यांचे न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
*💫सावंतवाडी,दि.२१-:* निरवडे-माळकरवाडी येथे अनधिकृत करण्यात आलेल्या उत्खननातील माती बाजूच्या शेतात घुसल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन या प्रकरणात मध्यस्थी केली असून, याबाबत येत्या दोन दिवसात बैठक घेऊन योग्य तो न्याय शेतकऱ्यांना मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने त्या ठिकाणी झालेल्या अनधिकृत उत्खननातील भरावाची माती शेतात गेली असा तेथील शेतकऱ्यांचा आरोप आहे,तसेच या प्रकाराची चौकशी करावी,असे शेतक-यांचे म्हणणे आहे.आज याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी श्री परब यांच्या कानावर हा प्रकार घातला. यावेळी त्यांनी आपण तुम्हाला योग्य तो न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे. यावेळी शेतकरी संतोष माळकर,भरत माळकर,सुधीर गावडे,बाबना माळकर, शंकर माळकर,आनंद माळकर आदी शेतकरी उपस्थित होते.
