प्रमोद जठार यांची मंत्री आशिष शेलारांकडे मागणी..
⚡कणकवली ता.२३-: स्वतःच्या धर्माकरिता हाल सोसून मरण पत्करलेल्या पण धर्मांतर न केलेल्या जगातील एकमेव अशा धर्मवीर संभाजीराजांचे भव्यदिव्य स्मारक आणि कोरिडॉर फार मोठे आकर्षक ठरू शकेल. कसबा संगमेश्वर येथे सरकारने स्मारकला मंजुरी दिली आहे. ११ मार्च २०२६ रोजी त्यांचा स्मृती दिवस असून त्या ठिकाणी दिवसभर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाला तसेच स्मारकासाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
श्री. जठार यांनी म्हटले आहे की, मराठा हिंदवी साम्राज्याचे प्रथम युवराज – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा येथे अटक होऊन पुढे निघृण हत्या करण्यात आली हे सर्व विदित आहे. याच कारणासाठी येथे एक भव्यदिव्य स्मारकभवन असावे, अशी येथील जनतेची भावना आहे. कसबा येथून सुरूवात केल्यास पुढे कारभाटले येथे म्हाळोजी घोरपडे यांचे – समाधीस्थान, त्यांच्याजवळच अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले शिवमंदिर, शृंगारपूर येथे महाराणी येसूबाई साहेबांचे माहेर आणि प्रत्यक्ष थोरले छत्रपती आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या वास्तव्याने पावन झालेले कसबा हे गाव अशी एक ऐतिहासिक मार्गिका येथे उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत बहुमूल्य ठेवा असे यांचे वर्णन होईल.
‘स्टॅच्यु ऑफ सॅक्रिफाईस’ नावाने धर्मवीर संभाजी छत्रपतींचा भव्य पुतळा, वस्तूसंग्रहालय आणि संदर्भग्रंथ वाचनालाय, लाईट अँड साऊंड शो, ध्वनी प्रकाश कार्यकम, बगिचा, भवानी मातेचा पुतळा आणि छोटेखानी मंदिर, एमटीडीसीचे विश्रांतीगृह (रिसॉर्ट), अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थाचे फुड कोर्ट, संगीत कारंजे, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी थिएटर, व्हीआयपी विश्रांतीगृह आदींचा या स्मारकात समावेश करावा. यासाठी भरवी निधीची तरतूद करावी, असे श्री. जठार यांनी म्हटले आहे.
