आमदार दीपक केसरकर: नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांचा केला सत्कार..
सावंतवाडी ता.१४ : धनशक्तीच्या पुढे निवडून येणे सोपे नाही. मतदारसंघात जे काही प्रकार सुरू आहेत ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहेत, अशी खंत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. थोडक्या मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांनी निराश न होता संघटनेसाठी काम करत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.यावेळी त्यांच्या हस्ते विजयी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
ते पुढे म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघात निवडणुकीदरम्यान अपक्ष उमेदवारांसाठी पैशांचा जो वापर झाला, तो लोकशाहीसाठी घातक आहे. हे प्रकार कोणी केले याची माहिती नसली तरी या संदर्भात वरिष्ठांचे लक्ष वेधणार आहे. महायुतीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळालेले यश आनंददायी आहे. मात्र येत्या काळात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पुढील महिनाभर प्रत्येक गावात जाऊन युवा पिढी तयार करण्याचा आणि संघटना वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी सर्वांची साथ आवश्यक आहे.गावांच्या विकासासाठी लागणारा निधी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असा विश्वासही त्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिला.
या कार्यक्रमास जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, अर्चित पोकळे, परीक्षेत मांजरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
