⚡मालवण ता.१०-: आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा महिमा भारतासह जगभरात पसरला आहे. कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या या आंगणेवाडीत येऊन भराडी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्याचा योग आज लाभला, लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित राहणाऱ्या आंगणेवाडी यात्रेचे उत्कृष्ट नियोजन आंगणे मंडळाने केले आहे, असे प्रतिपादन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी आंगणेवाडी येथे बोलताना केले.
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी आज सायंकाळी आंगणेवाडी यात्रेला भेट देऊन श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे आंगणेवाडी मंडळातर्फे स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सतीश आंगणे, आनंद आंगणे, स्वामीभक्त व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, दाजी सावजी, तसेच इंगळे यांच्या समवेत बाबासाहेब निंबाळकर, डॉ. पाटील, देवर मुनी आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी महेश इंगळे म्हणाले, आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे स्वयंभू असे स्थान आहे. भराडी देवीची व तिच्या यात्रेची महती जगभरात पसरली आहे. अशा यात्रेला उपस्थित राहून समाधान वाटले. सर्वांच्या सुख शांती साठी भराडी चरणी गाऱ्हाणे घातले आहे. श्री स्वामी समर्थ आणि कोकणचे जुने नाते आहे. स्वामी समर्थ यांचे कोकणातही वास्तव्य होते. अशा पावन भूमीत येण्याचा आज योग आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वामी समर्थांच्या विविध मठांना आपण भेटी देत आहोत. कोकणातून दरवर्षी बहुसंख्य स्वामी भक्त अक्कलकोट येथे भेट देऊन स्वामींचे दर्शन घेतात. श्री भराडी देवी व श्री स्वामी समर्थ यांचा कृपाशिर्वाद सर्वांवर कायम रहावा, असेही महेश इंगळे म्हणाले.
